Wednesday, September 2, 2015

जयहिंद साब !



धागा शौर्य का, राखी अभिमान की, या झी 24 तासच्या उपक्रमाच्या समारोपाच्या निमित्तानं काश्मीरात चार दिवस होतो. त्या निमित्तानं सैन्यदालाचं अंतरंग पाहता आलं, आपण मुंबई, पुणे, नाशिक, नागपुरात वास्तव्यास असताना आपण नेहमीच आर्मीच्या वसाहती पाहत आलो, मग त्या ख़डकी, असो वा देवळाली असो, आपण नेहमीच हे जग भिंतीच्या बाहेरुन पाहिलय, पण मी जेव्हा काश्मीरमध्ये जाऊन हे जग आतून पाहिलं, तेव्हा हे जग वेगळचं आहे, या निष्कर्षावर येऊन मी ठेपलो.
सैन्याच्या म्हणजेच रुढार्थाने प्रचलित असलेल्या आर्मीच्या वातावरणात गेल्यानंतर जाणवली ती शिस्त. स्वावलंबन, देशप्रेम आणि वेळेची तप्तरता. याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं जाणवलं हे की हा देश अत्यंत सुरक्षित हातांमध्ये आहे. काश्मीर म्हटल, की आपल्या समोर येणारा प्रदेश आणि त्या ठिकाणचं वास्तव वेगळचं आहे, हे पण जाणवलं.
श्रीनगर विमानतळावर उतरल्यापासून या सगळ्याचा शोध घेण्याच्या प्रयत्न केला आणि काही धक्कादायक निष्कर्ष हाती लागले, अर्थात ते माझे स्वतचे असावेत. पण माझ्यासाठी ते महत्त्वाचे आहेत असं वाटलं, अर्थात याची दुसरी बाजू असेल आणि चार दिवसांत सगळ्याच आर्मीचा, काश्मीरचा, माणसांचा तळ लागेल असंही न्ककीच नाही, पण माझा निष्कर्ष बरोबर आणि चुकांसह मी नोंदवू शकतो, हे निश्चित. किमान लोकशाहीनं एवढं तरी स्वातंत्र्य माझ्या पदरी दिलय, हे महत्त्वाचं.
सैन्याच्या कामात जाणवलेली शिस्त आणि वेळेची तप्तरता हे सगळ्यात महत्त्वाचं. एखादं काम एखाद्या माणसाला दिल्यानंतर त्यानं नाही म्हणायचं नाही, असा आर्मीचा नियम आहे. जी साब, येस साब अशीच काम होतात. कुठलाही एखादा वरिष्ठ अधिकारी दिसला तर जयहिंद साब करायचं असा जणू अलिखित नियमच आहे. जवानांचं डोकं रिकामं राहू नये, यासाठी हा नियम. तसचं एका मेजर सुभेदारनं सांगितलं ते लईच भारी वाटलं, तो म्हणाला एखाद्या देवळासमोरुन जाता, तेव्हा तुमचे हात नकळत वर उचलले जातातच ना, मग आर्मीत त्या जयहिंद साबला हेच महत्त्व आहे.
बदामबाग कॅम्पमध्ये बागकाम करणारे सैनिक जेव्हा, कर्नलची काळी गाडी पाहून काही सेंकदात पोझिशन्स घेवून जयहिंद साब करतात, हे पाहून मन भारावून गेलं, तर कर्नल साहेबांना भेटायची वेळ चुकली म्हणून स्वतची गाडी घेवून आम्हाला घेवून जाण्यासाठी येणा-या लेफ्टनंट कर्नल साहेबांचा राग आम्हाला खूप काही शिकवून गेला. आम्ही सिव्हिलियन्स ना आमच्या जगण्यात शिस्त पाळत, ना आमच्या कामाप्रती आमच्या मनात तितकाच आत्मभाव आहे, असं सतत जाणवत राहिलं.  
दुसरी गोष्ट जाणवली ती की हा देश अत्यंत सुरक्षित हातात आहे. आम्ही चार दिवस केलेल्या प्रवासात ज्या-ज्या वरिष्ठ मंडळींना भेटलो त्यांची पर्सनलिटी बघून पुरुष असून मला खूप हेवा वाटला. आपल्याकडे आणि काश्मीर पोलिसांच्या तुलनेतही आर्मीच्या अधिका-यांचं व्यक्तिमत्त्व आपल्या सगळ्यांना गारुड घालणारं आहे. आम्ही तीन ते चार कॅम्पमध्ये फिरलो, तिथल्या कर्नल, सेकंड कमांडर, लेफ्टनंट कर्नल, मेजर, सुभेदार मेजर अशा पदाधिका-यांशी आम्ही भेटलो, त्यांना बोलतं केलं. त्या सगळ्यांना बघून हा देश अत्यंत सुरक्षित हातात आहे, याची भावना सतत मनात जागृत राहिली.
मग ही माणसं राजस्थानची असो वा गुजरात, महाराष्ट्र वा पंजाबची असो. सगळ्यात लक्षात राहिला, तो उरीच्या सहा हजार फूट उंचीवर असलेल्या कॅम्पवरचा मित नावाचा मेजर. अवघा 20-21 वयाचा हा तरुण मिशरुडीही न फुटलेला. त्याच्या आई-बाबांनी त्याला इथे का पाठवला, असा प्रश्न आपल्याला पडावा अशी स्थिती, तर ऊरीच्या 4 जेकेएलआयच्या कर्नल भवरसिंहांना पाहून ऊर अभिमानानं भरुन यावा अशीच स्थिती.. अवध्या 35-36चा वाटणारा हा अधिकारी त्या सगळ्या प्रदेशाचा राजा आहे. तिथल्या कत्येक सैनिकांचं मनोबल वाढवण्यात याचा वाटा महत्त्वाचा. आम्ही गेलो तेव्हा भारतीय सैन्याचा एक जावन चककीत शहीद झालेला. तरीही अत्यंत प्रेमानं त्यानं त्यानं आमचं आगत स्वागत केलं. या साहेबानं आम्हाला नंतर एका 5 हजार फूट उंचीच्या पोस्टवर नेलं, तिथं जवान कसं राहतात हे सांगताना या राजाच्या डोळ्यात पाणी आलं. एके 47 हाती देत, त्यानं ही बंदूक कधी हाती घेतली होती का असा सवाल केला, आणि त्या बंदुकीचं वजन किती हे  पण दाखवलं, हेल्मेट, संरक्षणासाठी पोटावर आणि पाठीवर पत्रे वागवणा-या सैनिकांच्या एकूण वजनाचा हिशोब करत, या पोस्टवर राहणं किती कठीण आहे, हे पण या क्रनल साहेबानं आम्हाला दाखवलं. आपला एक सैनिक मारला गेला, तर पाकचे चार तरी सैनिक मारुच, आणि सगळ्याच गोष्टी माध्यमांना द्यायच्या नसतात, हेही त्यांनी सांगितलं. आम्ही गेलो तेव्हा खरतरं 25-26 तापमान, पण हा काश्मीरसाठी  खरं तर उन्हाळाच... पुढचे आठ महिने बर्फवृष्टीत र्त्यांना 11 हजार फूट उंचीवर सैन्य तळावर काढावे लागतात. तेव्हा त्यांना या उन्हाळ्यापसूनच मिठापासून सगळ्या धान्याची साठवण करुन ठेवावी लागते. आणि या आठ महिन्याच्या काळात जेव्हा श्रीनगरपासून काश्मीरच्या काही शहरांचाच संपर्क तुटतो, अशा काळात एवढ्या वरच्या पोस्टवर काय स्थिती असेल, याचा विचारच केलेला बरा.. अशा स्थितीत कोणी आजारी पडलं, तर अशा सैनिकांला घेवून येण्यासाठी हेलिकॉप्टर हा एकमेव ऑप्शन असतो. अशा स्थितीत चौकीवर असणा-या प्रत्येकालाच जेवण येणं गरजेचं असतं. अशा स्थितीत ही मंडळी कशी काम करतात, हे मनात आलं तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. हे सगळं सांगताना भारावणारे कर्नल भवरसिंह पाहून मन उंचबळून येतं. त्यांच्या कॅम्पवर असलेला शिवालीक नावाच साडे सहा फूट उंचीचा मेजर असो वा सुरेशकुमार नावाचे वयाने थोडे जास्त असणारे पण पूर्वाश्रमीचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक असोत, त्यांची जगण्याकडे बघण्याची दृष्टी पाहून, त्यांच्या चेह-यावरचा आनंद पाहून समाधानच वाटतं. बदामबागमध्ये भेटलेले मीडिया सेलचे कर्नल सुरेशकुमार हे तर सव्वा सहा फूट उंचीचे आणि गोरेपान.. या माणसानं आमच्यावर गारुड केलं नसतं तरच नवल.. त्यानं आम्हाला काश्मीरच्या प्रति काम करत असलेल्या सैनिकांच्या कामाची जाणीव तर आम्हाला करुन दिलीच, पण इतर प्रदेशातल्या सिव्हिलियन्सनी या सगळ्या काश्मीरकडे कसं पहावं याची दृष्टीही दिली.. तिथे भेटलेला प्रत्येक अधिकारी असा रुबाबदार होता. टीए 160 कॅम्पमध्ये भेटलेला संदीप राणा तर एकदम फिट, त्याला त्याच्या फिटनेसचं राज विचारलं, तर त्याच्या अधिका-याचं उत्तर होतं, साब दिन में चार घंटे फूटब़ल, ह़ॉलिब़ल खेलते है, और दो घंटा जीम करते है, त्यानं बिचा-यानं नम्रतापूर्वक सांगितलं की फिटनेस हेच तर आर्मीत महत्त्वाचं आहे. अमन कमान ब्रिजच्या पॉईंटवर भेटलेला मेजर विनय यापैकीच एक.. अमन कमान ब्रिज या भारत-पाकच्या अगदी एलओसीच्या बॉर्डवर तैनात असलेला हा मेजर आपल्या अनेकांसाठी प्रेरणादायी असाच.. तिथे आम्ही त्याच्यासोबत एका वरपर्यंतच्या पोस्टचाही प्रवास केला. त्याठिकाणी सैनिक खरचं कसे राहतात, आणि त्या ठिकाणी पोहचण्यासाठी त्यांना लागणारे कष्ट आम्हाला प्रत्यक्षात अनुभवता आले. प्रत्येक्षक क्षणाला पाकच्या बंदुकीच्या टोकावर जगताना या सैनिकांच्या मनात किती देशप्रेम असेल, हे जाणवलं.. आणि स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनीही झेंडावदनाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवणा-या आम्हा सर्व देशवासियांची मनापासून लाज वाटली.   
कित्येक मराठी माणसं त्या परिसरात जवान ते अत्यंत उच्चपदावर काम करताना आम्हाला दिसली. पण प्रत्येकाच्या मनात असलेला देशप्रेमाचा ओघवता प्रवाह पाहून थक्क व्हायला झालं. मराठीतले गडी भेटूनही संवाद झाले ते हिंदीतच. कारण ही राष्ट्रभाषा आहे, आणि त्यांची जीवनदृष्टीच त्या भारतीयत्वाच्या नावान मोहमय झालेली आहे. सैन्याच्या वरिष्ठ मेजर सुभेदार पदावर कार्यरत असलेले कल्याणचे मानवजित ठाकूर यांचं काश्मीर खोरं आणि इतिहासाचं ज्ञान पाहून आम्ही सगळेच चांगलेच प्रभावित झालो, म्हणजे ही मंडळी केवळ तिथे नेमणूक आहेत म्हणून नाहीत, तर त्यांना त्या प्रदेशाबाबत आदर आहे, आणि तो प्रदेश आपला असल्याची आत्यंतिक भावनाही..  
झेलमचं पात्र पाहून भारत आणि पाकला दुंभगून ही जीवनवाहिनी इतकी शांतपणे कशी वाहू शकते, याचं नवल वाटतं. तिचं डोंगर, द-यातलं सौंदर्य क्षणाक्षणाला मोहवून टाकतं, आणि एका अनुरुप सुखाचा अनुभव देवून जातं. ते मोबाईलच्या फोटोत कैद करुन अनेकदा उपयोगच नसतो, कारण तिचा खळखळणारा आवाज त्या फोटोत कधीच कैद होवू शकत नाही.         
आम्ही चार दिवस तिथं होतो, पण आमचा क्षण न क्षण कसा योग्य जाईल याची योग्य तरतूदच सैन्यातर्फे करण्यात आली होती. आमच्यासोबत असलेले सैन्यदलाचे जवान मुख्यारभाई यांचा फॉलोअप प्रत्येक ठिकाणी घेतला जात होता, आणि प्रत्येक कॅम्पवर पोहचण्याआधी तिथले वरिष्ठ अधिकारी आमच्याशी स्वत बोलत होते, प्रत्यक्ष भेटीपूर्वी एका ठिकाणच्या वरिष्ठ अधिका-यानं तर आम्ही पोहोचेपर्यंत 20-30 फोन केल्याचंही आम्ही पाहिलं. आपल्या वरिष्ठांनी दिलेली ऑर्डर पाळण्यासाठी त्या सैनिकांचा, अधिका-यांचा अट्टाहास पाहून मन गलबलायला झालं. कित्येक ठिकाणी तर सुरक्षेची कारणं असली तरी नम्रपणाने नकार देत, जे जे देशापुढे जायला हवं, त्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार थक्क करणारा होता. कुठल्याही एखाद्याही प्रसंगात सैन्यदलाचं चुकीचं चित्र देशातील नागरिकांसमोर उभे राहू नये, यासाठी ते अतिशय काटोकेर होते.
आणखीन एक बाब म्हणजे, सैन्यात मिळणा-या अन्नाविषयी.. सगळ्या प्रदेशातील, आणि अनेक पथ्यांचे लोक असल्यामुळे तिथं अत्यंत साध पण पोटभर जेवण बनविण्यात येत. तिखट, मसालेदार असे पदार्थ फारसे नसले, तरी प्रत्येकाला पोटभर मिळेल, याची योग्य व्यवस्था करण्यात आलेली असते. अगदीच ऑपिसर्सच्या पंगतीला स्वीट डिशचा एखादा अपवाद वगळला तर प्रत्येकाच्या पदरात योग्य पौष्टिक, साधं आणि पोटभर जेवण पडेल, याची पुरेपूर व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. यामुळेच या मंडळींचा फिटनेस वाखाणण्याजोगा असावा.     

प्रत्येक कॅम्पवर आमचं झालेलं स्वागत, आमचं आदरातिथ्य हे डोळ्यातून पाणी काढणारं होतं. सगळ्यात जाणवला तो जवानांचा प्रामाणिकपणा.. आपल्या भ्रष्ट कारभार असणा-या देशात अगदी आपल्या रुमबाहेर दिवसरात्र आपली देखभाल करणारा सैनिकही टीप वगैरे घेत नाही, हे पाहून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहिला नाही.
जम्मू काश्मीरमध्ये घरदार सोडून राहिलेल्या या जवानांना सातत्यानं आगीशी खेळ करावा लागतो. शत्रू कोण हे माहित नसतानाही, त्या त्या गावात पाच सहा तास खडा पहारा द्यावा लागतो.. आणि खरं सांगतो, त्या परिसरात आर्मीचे हे कॅम्प, सैनिक, सातत्यानं होणारी आर्मीच्या गाड्यांची ये-जा आहे, म्हणूनच काश्मीर आपल्याकडे सुरक्षित आहे, असं आम्हाला वाटलं.
आर आर रायफल्स 52च्या कॅम्पवर गेलो असताना. हे सैनिक किती कडवी झुंज देतायेत हे अनुभवलं. कार्यक्रम सुरु असताना एक तुकडी एका ऑपरेशनसाठी बाहेर पडली, ती ही अवघ्या 5 मिनिटांत. त्यांची शस्त्र, त्यांची पळापळ.. त्यांची शेवटची निकराची प्रार्थना आणि हे सगळं करतानाचा त्यांचा आवेश पाहून.. त्यांचं मनोधैर्य किती मोठ्या उंचीचं असेल, हे अनुभवता आलं. काश्मीरच्या सुमारे प्रत्येक गावागावात, रस्ताय रस्त्यांवर या आर.आर. रायफल्सच्या सैनिकांची उभी गस्त कशी असते, आणि त्यांचं एकूणच वेळापत्रक कसं आहे, हे पहायला मिळालं.
प्रश्न उरतो तो काश्मीर खो-यांत कसं वातावरण आहे हा.. अगदी खरं सांगयचं तर श्रीनगरपासून आम्ही ज्या ज्या भागात फिरलो, तो तो भाग आपल्या मुंबई, पुणे, नाशिक अगदी जिल्हा ठिकाणांपेक्षाही अगदी कमी विकसीत वाटला. कित्येक ठिकाणी साधी घरे, दुकाने असं आपल्याकडे 20-25 वर्षांपूर्वी असलेलं वातावरण आम्हाला अनुभवायला मिळालं.. काश्मीरातला गरीब असो वा, मुंबईतला यांच्या दोघांच्या परिस्थितीत फार काही फरक आहे, असं काही जाणवलं नाही. दुसरी बाब जामवली ती म्हणजे शिक्षणांचं वाढतं प्रमाण. प्रत्येक गावात असलेल्या शाळा, स्कूलबसच्या फे-या यातून काश्मीरच्या विद्यार्थ्यांचं शिक्षणाप्रती प्रेम पाहून बरं वाटलं.
काश्मीरपेक्षाही जम्मू भाग हा अधिक पुढारलेला आहे, असं आमचा ड्रायव्हर शब्बीरभाईच्या बोलण्यातलं आलं. हा मुळचा श्रीनगरचा.. मात्र साततत्यानं या सर्व भागात त्याचा प्रवास असल्यानं, त्यानं सांगितलेली काही निरिक्षण महत्त्वाची वाटली. काश्मीर भागात सृष्टीसौंदर्य आहे, पर्यटन हा या भागातील महत्त्वाचा व्यवसाय. मात्र गेल्या वर्षी आलेल्या पुरानंतर या व्यवसायाची पाठ कोलमडली आहे. या पुरामुळं काश्मीर खोरं अधिक मागे गेलं असं त्याच्या बोलण्यातनं कळलं. काश्मीरमध्ये सध्या पीडीपी आणि भाजपचं सरकार असलं तरी हुरियत कॉन्फरन्सचे नेतेच अधिक सरकार चालवत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याच्या एकूण बोलण्यातून काश्मिरी जनता या सगळ्या भांडणाला कंटाळली आहे, आणि एकदा काही तरी एक कायमस्वरुपी तोडगा निघावा अशी त्यांची इच्छा असल्याचं जाणवलं. पाकबाबात आकर्षण असलं तरी त्यांना भारतात राहण्याचा सार्थ अभिमानही जाणवला. भारत हा पाकच्या कितीतरी पट पुढे आहे, मात्र एवढं करुनही काशमीर खो-याचं स्वतंत्र अस्तित्व असावा, असाही एक मतप्रवाह असल्याचं त्याच्या बोलण्यातनं जाणवलं.
सैन्य त्या भागात कशा परिस्थितीत काम करत आहे, हे पदोपदी जाणवलंच. मात्र हे दृढ झालं ते बदामबागमधील आर्मीचं संग्रहालय पाहून.. 1947 पासून ते आतात्पार्यंतच्या सैन्यदलानं केलेल्या लढाया, त्यातही शत्रूपक्षाकडून जिंकलेली शस्त्र या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. एके 47 आणि एके 56 रायफल्सच्या विभागात तब्बल 30 हजार शस्त्र दहशतवादी कारवायांतून जप्त करण्यात आली आहेत. त्यानंतर संग्रहालयात जागा नसल्यानं 2010 नंतर ही शस्त्रचं स्वीकारण्यात आलेली नाहीत. त्यात पिसतूल, रॉकेट लाँचरपासून अनेक शस्त्रांचा समावेश आहे. हे सगळं मिळालेल्या शस्त्रांच्या केवळ हिमनगाचं टोक असल्याचं सांगितल्यानंतर पाककडून होणा-या कुरघोड्यांचं गणितचं आमच्या लक्षात आलं. 11-साडे 11 हजार फूट उंचीवर लढणा-या सैनिकांच्या, वरिष्ठांच्या कहाण्या ऐकून अंगावर रोमांच उभे राहिले.
त्याचसोबत आर्मीकडून खो-यात करण्यात येणा-या चांगल्या उपक्रामांबाबतही यातून माहिती मिळाली. त्यात महिला सबलीकरण केंद्र, सैन्यांतर्फे सुरु करण्यात आलेल्या शाळा, पुलांची आणि रस्त्यांची उभारणी, पूरस्थितीत सैन्यानं केलेलं मदतकार्य या सगळ्यांचा समावेश होता. याहीपेक्षा श्रीनगरमध्ये ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या मुलांसाठी सैन्यानं शाळा सुरु केल्याचं सांगितल्यानंतर मन भारावून गेलं. आणि सैन्याप्रतीचा आदर द्विगुणित झाला.
काश्मीरच्या खो-यात आपलं घरदार सोडून राहणा-या या सैनिकांप्रती स्थानिक नागरिकांच्या मनात प्रेम उत्पन्न व्हावं, ही सैन्याची धारणा आहे. याच हेतूने काश्मीर खो-यांतील काही गावांमधून स्थानिक जवान सैन्यात भरती करण्यासाठी सैन्यदलाचे प्रयत्न सुरु आहेत. घरदार सोडून येणा-या सैनिक वा अधिका-याला पाहून जेव्हा एखाद्या गावातील एखादा लहानगा दहशतीने पळून जातो, तेव्हा या सैनिकांच्या मनाला किती वेदना होत असतील, असा सवाल मला त्या ठिकाणी एका अधिका-यानं विचारला. खरंतर सैन्याचं काम हे भूभाग संरक्षणाचं पण काश्मीर खो-यातल्या मंडळींबाबत एक आपुलकीची भावना निर्माण करण्याचं मोठं आव्हान सैन्यासमोर आहे, आणि ते पेलण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. काश्मिरींसाठी भारतीय सैन्य अशा एका भव्य विचारांवर राष्ट्रीय एकात्मता वाढवण्याचा सैन्याचा प्रयत्न आहे. यासाठी गरज आहे ती आपआपल्या प्रदेशातूनही काश्मिरी जनतेला, काश्मिरी युवकांना हा देश आपला आहे, हे जाणवून देण्याची. यासाठी आवश्यक असलेल्या एकात्मततेच्या बाबींमध्ये आपणही सर्वांनी पुढाकार घ्यावा, याची खरी गरज आहे.
काश्मिरमध्ये असलेल्या अनेक कायद्यांमुळे त्या प्रदेशाच्या विकासाला मर्याला आहेत, हे नक्कीच. मात्र जोपर्यंत त्यांच्या शिक्षणाचा, रोजगाराचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत दहशतवादी हल्ल्याचं हे आव्हान सैन्यापुढे कायम असणारं असं जाणवलं. हे थांबवण्यासाठी आपल्या सगळ्यांकडूनच, सरकार आणि प्रशासनाव्यतिरिक्तही अधिक प्रयत्न होण्याची गरज आहे.
आम्ही श्रीनगरहून परतत असताना, आमच्या विमानात एक फौजी होते, ते साडे अकरा हजार फूट उंचीवर कार्यरत होते, ते मुळचे बेळगावचे. त्यांच्या वडिलांना त्रास सुरु झाल्याचं कळताच ते पोस्ट सोडून निघाले पण त्यांना त्यांच्या कॅम्पवर पोहचालया तब्बल दोन दिवस लागले. दोन दिवसांनंतर त्यांना विमानतळावर यायला सहा तासांचा प्रवास करायला लागला. या सगळ्या प्रवासात त्यांच्या वडिलांचं निधन झाल्याची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली. आमच्या विमानानं ते मुंबईला उतरले आणि त्यापुढे गाडी करुन ते बेळगावला पोहचणार होते.
या अशा परिस्थितींवर मात करत, आपल्या देशासाठी जीवाची बाजी लावणा-या या सैन्यदलाबाबत एकच भावना येते. ती म्हणजे जयहिंद साब...एवढं तरी आम्ही आमच्या दैनंदिन आयुष्यात आचरणात आणलं, तरी खूप आहे. आर आर रायफल्सच्या सेकंड कमांडरच्या भाषेत सांगायचं झालं तर सैन्याबाबत देशात अनेकांच्या मनात अनेक चुकीचे समज आहेत, त्यानं म्हटलं. आर्मी म्हणजे शिस्त.. आणि जीवन जगण्याची ही एक सुंदर पद्धतच आहे..
रारंगढांग वाटताना आपणही कधीतरी असं काही तरी पहावं, जगावं, अशी इच्छा मनात आली होती, या चार दिवसांच्या निमित्तानं का हीना, पण ही इच्छा पूर्ण झाली.. आपण कधी आर्मीत का गेलो नाही, असा प्रश्नही मनाला पडला. त्याची रुखरुखही वाटली.. भविष्यात आपल्या मुलाबाळांच्या पातळीवर तरी आपण हा आग्रह धरुयात.. ही भावनाही मनात आली..
जयहिंद           


Thursday, December 18, 2014

एकाकी, अस्वस्थ - अश्वत्थामा

माणूस एकाकी असतो म्हणून अस्वस्थ असतो की, आजूबाजूला सगळे गटागटानी किंवा कुणी तरी कुणाच्या सोबत असतं म्हणून जास्त अस्वस्थ असतो. खरं तर माणूस हा तसा समाजशील प्राणी आहे, पण एका ठराविक काळानंतर कुणालाच फार समाजात वावरायला आवडत नाही. त्याला त्याचा त्याचा निवांतपणा एकटेपणा नेहमीच खुणावत राहतो ना.. मग या निमित्तानं एकाकी राहणं ही टर्म तरी नेमकी काय आहे.
गेल्या 10 वर्षांत म्हणजे कळायला लागल्यापासून असं लौकिकार्थानं एकाकी राहणं, हे माझ्या वाट्याला ब-या पैकी आलंय, म्हणजे जवळपास 4 ते 5 वर्ष तरी.. अशी संधी उपलब्ध करुन देणा-यांचे यानिमित्तानं मी आभारही मानतो. पण प्रश्न तो नाहीये.. प्रश्न असा आहे की हे 10 वर्षांपासून वाटायला लागलंय की त्यापूर्वीही आपण एकाकीच होतो.. लौकिकार्थाने कुटुंबवत्सल माणूस होणं, मग त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी उदा. नोकरी, घर, इ.. मिळवणं हेच आपल्याकडचे सिद्धतेचे निकष ठरतायेत का..
एखादा माणूस या सगळ्यापेक्षा वेगळा विचार करतो किंवा करु शकतो, त्याच्या सुखाच्या आणि समाधानाच्या व्याख्या थोड्या वेगळ्या आडवळणानं जाणाऱ्या असल्या तर त्यात अमान्य असणारं ते काय.. मला गेल्या 4 ते 5वर्षांत या बाबी सातत्यानं कळत राहिल्या.. मग आपण ज्या व्यक्तिसोबत उर्वरित आयुष्य व्यथित करण्याचा निर्णय घेतो आहोत, ती व्यक्ती पण त्याच विचारांची असेल तर ठीक, अन्यथा पुन्हा हा एकाकीपणाचा कालखंडच आपल्या पदरात पडणार नाही, याची खात्री कोण देणार
एकटं जगण्यात अधिक मजा आहे, असं कौटुंबिक माणसांना, तर कौटुंबिक जगण्यात अधिक मजा आहे, असं एकटं वाटणाऱ्या माणसाला वाटतं राहतं, म्हणजे एखाद्या लहान मुलाच्या हाती असलेलं डेअरी मिल्क बघून, दुसऱ्या एका लहान मुलाला त्याच्या हाती असलेल्या फाईव्ह स्टारची मजा वाटेनासी होते, तसं आहे का.. अगदी आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या साथीदाराबाबतही हेच होत असतं का, समोरच्याची बायको आपल्या बायकोपेक्षा अधिक सुंदर वाटत राहते का.. या सगळ्याच्या मुळाशी जाताना आपण आपल्या सद्य परिस्थितीबाबत कधीच समाधानी नसतो, म्हणून ती अस्वस्थता असते काय... एखाच माणसासोबत किंवा बाईसोबत सतत राहताना कंटाळा येत असेल का..त्यातही तिचे आणि त्याचे आवडीचे विषय हे परस्परभिन्न असल्यास आणि समाधान आणि सुखाच्या व्याख्याही वेगवेगळ्या असल्यास त्याचा सर्वाधिक फटका दोघांनाही बसत असावा काय..
काही वेळा आपले आई वडील आणि आजूबाजूची मित्रमंडळीही आपल्याला आपल्या स्तरापेक्षा म्हणजे वैचारिक हा, अधिक कमी पातळीवरची भासू शकतात काय.. किंवा झापडेबंद जगण्यातच धन्यता मानून आपणही त्यांच्यासारखचं वागाव असा आग्रह धरुन ते आपल्या वाढीला मारक ठरतात का, किंवा याची दुसरी बाजू आपण उगाचच स्वतला जास्त शहाणे समजतो का..
कुठल्याही परिस्थितीत सुखी राहणारी आणि एकमेकांच्या किंवा कुटुंबाच्या साथीनं उत्तुंग यश मिळवणारीही माणसं याच समाजात आहेत, त्यांचं मला नेहमी कौतुक वाटतं राहिलय, ते भाग्यवान असतात तरी किंवा ते स्वत त्या घडीत व्यवस्थित जमवून तरी घेत असले पाहिजेत.. मग त्यांना अस्वस्थ वाटत नसेल काय कधी, की ते दाखवत नसतील किंवा खरचं त्यांना ते जाणवत पण नसेल..
अस्वस्थता पाठ सोडत नाही म्हणजे नेमकं काय होतं.. म्हणजे कधीकधी एकदम आपण करत असलेल्या कामाचा किंवा त्या क्षणाचा किंवा त्या वर्तमानाचा म्हणू यात हवं तर एकदम कंटाळा वाटायला लागतो.. किंवा एकदम निराशेची लाट येते मनात.. आणि आपण कसं सगळचं चुकीचं करतोय, असं जाणवत राहतं.. खर तर माझ्या अनुभवावरुन करण्यासारखं खूप काही असतं. पुस्तक असतात, सिनेमा असतात, प्रवास असतो, चांगलं खाणं असतं..अगदीच काही नाही तर टीव्ही तरी नक्की असतो.. पण त्या क्षणाला ते सगळं अगदी नकोसं होऊन जातं.. आणि कुणी तरी सोबत असलं की त्या व्यक्तीचा कंटाळा येतो आणि मग या वरील बाबींपैकी एखादी बाब करावी असं वाटायला लागतं.. म्हणजेच आहे त्या परिस्थितीत समाधानी रहायचंच नाही, असा चंग मनाने बांधलेला असतो. 
    मग व्यसनांची निर्मिती या अस्वस्थेतूनच होत राहते काय, आपलं काहीच चुकत नाही, तरी आपल्यासोबतच असं का घडतयं, ही भावना अधिक तीव्र होत जाते, आणि मग माणसांवरचा, आजूबाजूच्या परिस्थितीवरचा आणि देवावरचाही विश्वास उडत जातो काय.. मग काही प्रश्नांची उत्तरे मिळतच नाहीत, असं वाटायला लागतं, मग ती उत्तर शोधण्यापेक्षा समाधानी अवस्थेत जाण्याची धडपड त्याच्या त्याच्या पातळीवर सुरु होते..
मग ती कुणी तरी कुठल्यातरी बाबा-बुवाच्या श्रद्धेच्या पातळीवर, किंवा कुणी तंबाखू, दारु, सिगारेट या पातळीवर ती क्षणिक रिलॅक्सेशनची प्रोसेस अनुभवण्याचा प्रयत्न करत राहतो, किंवा किमान शोधण्याचा प्रयत्न करत राहतो काय, किंवा आपण समाधानी राहूच शकत नाही, अशा एका पातळीवर येऊन हे असचं आहे, आणि असचं पुढेही कायम सतत सुरुच राहणार आहे असं वाटतं राहतं..
आत्महत्या करणं हे यातील एकदम टोकाचं पाऊल असतं काय, कारण एकतर आपण एक नंबरचे भित्रे असतो, त्यामुळे आपल्या सामान्यांच्या कुणाच्याच गांडीत हे सगळं अमान्य आहे म्हणून जीवनयात्रा संपवावी असा टोकाचा विचार करायची हिंमत नसते, आणि मग जी ते करतात त्यांच्याबाबत हळहळ किंवा केवळ मुर्खपणा या दृष्टीनं विचार करुन आपण त्या किंवा तिला बोगस म्हणून ठरवायला आणि आपल्या मनाला ऑल इज वेल असं सांगायला मोकळे होत जातो का..
वैयक्तिक आयुष्यासोबतच ऑफिसमधील ताणतणावाचे प्रसंग, प्रवासातील तणाव या बाबींमुळेही आपण दिवसेंदिवस खचत तरी जातो, किंवा आपण एका सॅच्युरेशन पॉईंटला तरी पोहोचत जातो.. मग हे सर्कल तोडायला हवं असं वाटतं राहत, मग तीच तीच माणसं, तेच तेच काम कंटाळवाणं वाटतं राहतं का, मग त्यासाठी ब्रेक घेऊन सुट्टीवर जातो, पण तिथेही पुन्हा तेच किंवा पुन्हा आल्यावर तेच हीच भावना तीव्रतेने असते का, आणि ती कुणाला जाणवते का..
या सगळ्यातून मग कायमची मुक्ती आपण कशी काय मिळवू शकतो बरं.. मग आपण आपले छंद तरी शोधायला हवेत किंवा आपल्या गुणवत्तेचं म्हणजे आपल्या मानांकनाच्या गुणवत्तेच आयुष्य व्यथित करायला हवं, आता हे गुणवत्तापूर्वक आयुष्य म्हणजे नेमकं काय, हे ज्याचं त्यानी ठरवायला हवं, असं आयुष्य घालवण्याची मुभाही त्या त्या स्त्री-पुरुषाला मिळायला हवी, आपल्यावरच्या तथाकथित जबाबदाऱ्या, समाज काय म्हणेल, या खोट्या कल्पनेचं स्तोम, आपणच ठरवलेल्या झापडबंद सुखी आयुष्याच्या कल्पना, यातून जोपर्यंत आपण मुक्त होत ही तोपर्यंत हे होणं अशक्य आहे.. आणि त्यासाठी लागणारा धीरही जमा करावा लागेल. त्यामुळे एकाकीपण हे नेहमीच तुम्हाला तुमच्या अस्वस्थेसह स्वीकारावंच लागेल आणि त्यातून काही सर्जन मिळेल अशी खोटी अपेक्षा ठेऊन तुम्हाला जगावं तरी लागेल..
मरणाचा शोध घेणारा अश्वत्थामा आणि आपण सगळे सारखेच असतो का, त्याच्या फक्त कपाळावर जखम आहे, आपल्या ह्रद्यात, मेंदूत ती असावी...

   

Sunday, November 2, 2014

कधीतरी ‘आपलं’ म्हणाच !




पाच वर्षांपूर्वी कुणी असं सांगितलं असतं की 2014 साली राज्यात भाजपचं सरकार येईल, त्यांचा शपथविधी सोहळा वानखेडे स्टेडियमवर होईल आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होतील..तर त्या सांगणाऱ्या इसमाला सगळ्यांनीच वेड्यात काढलं असतं...पण अखेरीस ते वास्तवात आलय. हीच लोकशाहीची खरी ताकद आहे.. या विचारांशी संबंधित असलेल्यांनाही अजून यावर विश्वास बसत नाहीय. त्यामुळे इतरांची तर गोष्टच सोडा.. त्यामुळे अनेकांना पोटशूळ उठलाय.. आणि या ना त्या निमित्तानं सोशल मीडियासह सगळीकडेच काहीही दाखले, उदाहरणे देत भाजपवर टीका करण्याची संधी सोडली जात नाहीये.. कुणी कितीही टीका केली तरी वास्तव मात्र बदलणार नाहीये....
1960 पासून अगदी काही मोजकी वर्षे वगळली तर तीच तीच नेतेमंडळी राज्याचा गाडा हाकताना दिसतायेत.. त्यांतल्या काही नेत्यांचं नेतृत्व आभाळाएवढं होतं.. त्यांना त्यावेळी संधी मिळाली त्यामुळेच ही मंडळी एवढं मोठं काम करु शकली.. बाकीच्या नेतृत्वानंही अगदीच सगळंच चांगलं केलेलं नाही... नाहीतर ही संधी आत्ता मिळालीच नसती.. आता ही संधी काही नव्या चेहऱ्यांना मिळतेय.
राजकारण म्हणजे केवळ गुंड, बिल्डर, कंत्राटदार, अधिकाऱ्यांशी संगनमतं, भ्रष्टाचार, लोचखोरी हे समीकरण झालं होतं.. स्वच्छ प्रतिमेची, सर्वसामान्य घरातील व्यक्ती राजकारण करु शकते, हेच आत्ताआत्तापर्यंत अशक्य वाटतं होतं..त्यामुळेच जनतेच्या मनात असंतोष वाढत होता, बदललेल्या पिढीचा हा हुंकार अण्णांच्या आंदोलनापासून, लोकसभा निवडणुकीत आणि आता विधानसभा निवडणूक निकालाच्या निमित्तानं समोर आलाय... त्यामुळेच केंद्रात आणि राज्यात एका नव्या नेतृत्वाला संधी मिळाली आहे..
राज्याच्या नव्या मंत्रिमंडळातील चेहरे हे रा.स्व.संघ परिवाराच्या मुशीतले निष्ठावान कार्यकर्ते आहेत. अभाविपसारख्या विद्यार्थी चळवळीत काम करत इथपर्यंत प्रवास करणारे नेते आहेत. राजकारणात येण्यापूर्वी समाजकारण करताना, आलेल्या अनुभवांमुळे त्यांना जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण आहे.. स्कॉर्पिओ, बुलोरोच्या एसीत बसून राजकारण करणाऱ्या राजकीय नेत्यांपेक्षा या मंडळींचा पिंड नक्कीच वेगळा आहे..
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात मिळवलेल्या भरघोस यशानंतर जागावाटपापासून ते निकालापर्यंत शिवसेनेला भाजपनं दिलेला धक्काही योग्यच म्हणावा लागेल.. शिवसेना जागावाटपात भाजपला जेवढ्या जागा देऊ इच्छित होती, त्यापेक्षा चार ते पाच जास्त जागा भाजपने स्वबळावर जिंकून दाखवल्या आहेत (अगदी आयाराम-गयारामही गृहित धरले तरी ते आज भाजपच्या झेंड्याखालीच आहेत, हे वास्तव आहेच). कोणताही पक्ष हा विस्तार करण्यासाठीच कार्यरत असतो, आणि तीच भाजपची भूमिका आहे. आता तर आक्रमकेतून बाहेर पडलेली शिवसेना राज्यात सत्तेत सहभागी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या मातब्बर प्रादेशिक पक्षानंही भाजपला बिनशर्त (?) पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केलीय. त्यामुळे आता हे भाजपचं सरकार असणार आणि ते स्थिर असणार याबाबतचे सगळे तर्कवितर्क संपलेले आहेत.. अगदी कितीही टीका झाली तरी..

          अशक्य वाटणारी सत्ता मिळाल्यानं, आता नव्या नेतृत्वाची जबाबदारी वाढली आहे.. सर्वसामान्यांचे नेते म्हणून या मंत्र्यांकडूनच्या अपेक्षाही तितक्याच वाढलेल्या आहेत. शिवछत्रपतींचा आशीर्वाद मागून, सत्तेवर पोहचलेल्या या नेतृत्वाला आता राज्यात खऱ्याअर्थी शिवशाही निर्माण करायची आहे. त्यामुळे सत्तेचा उन्माद न करता, ही मंडळी हे कार्य करतील, अशी अपेक्षा बाळगूयात आणि त्यांना काम करण्याची संधी देऊयात.. याच शुभेच्छा !

Sunday, November 13, 2011

मनाचा ठाव घेणारं 'देऊळ'







आत्तापर्यंत धर्म आणि देव याबाबत जाहीर घेण्यास कुचराई करणा-या महाराष्ट्रात असा एक मराठी चित्रपट निर्माण व्हावा... ज्यानं आपल्या श्रद्धेलाच तडा जावा.. असा काही अनुभव मला काल 'देऊळ' सिनेमा पाहताना आला.. बरं फक्त एवढचं याचं वैशिष्ठ्य नाही.. ग्रामीण महाराष्ट्र.. त्यातला बरोजगार युवक.. त्याच्या रिकाम्या वेळाचा राजकारणी आणि इतर अविवेकी गोष्टींच्या माध्यमातून होणारा दुरुपयोग.. सिनेमाच्या फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफमध्ये जाणवणारे विरोधाभास.. अंगावर येणारं आणि कुणाच्याही विरोधात नसलेलं दत्ता दिगंबरा हे गाणं.. आमदार, स्थानिक पुढारी यांच्या वरचष्म्यात असलेली उदा. सरपंचांची भूमिका.. अण्णांसारख्या तत्ववेष्ट्याची सिनेमातली मनाला स्पर्शणारी मात्र अचानकपणे गायब होणारी भूमिका.. नायकाचा आक्रोश अशा कितीतरी गोष्टी ज्या कधीच विसरु शकणार नाहीत अशा..
सर्वात पहिल्यांदा अशा संवेदनशील विषयावर कुणालाही न दुखावणारा (अगदी देवही निवडून घेतलेला) असा चित्रपट इतक्या धीटपणे सिनेमात मांडणा-या सर्वच टीमचं मी मनापासून कौतुक करतो.. दुसरं अप्रतिम कास्टिंग.. कुठल्या भूमिकेसाठी कोण माणूस आणि तोही मराठीतला सर्वोच्च असाच हे निवडण्याबाबत धन्यवाद.. खरं सांगतो मनापासून गेल्या कित्येक वर्षांत म्हणजे माझ्या आठवणीत सुमित्रा भावे आणि सुनील सुखथनकर यांच्या 'वास्तुपुरुष' नंतर खरचं ताकदीचा सिनेमा असं ज्याचं वर्णन करता येईल तो देऊळ.. ज्यात केवळ आशय नाही.. नैमत्तिक नाही.. अनेक जुन्या रुढी उलगडणारा अनेक नवं संचित देणारा असा सिनेमा.. व्वा व्वा.. क्या बात है !
आता मुख्य सिनेमाविषयी .. अगदी पहिल्या फ्रेमपासून अगदी नावं सुरु होण्यापासून ते अगदी शेवटच्या मूर्ती विसर्जनापर्यंत आणि त्यानंततरच्या शांततेत साकारलेल्या काही निसर्गाच्या फ्रेमपर्यंत हा सिनेमा तुम्हाला घट्ट धरुन ठवतो.. कथानकाची सुरुवात..गिरीष कुलकर्णींचा वळूप्रमाणेच सरस अभिनय.. त्याचा त्याच्या गाईसाठी तुटणारा जीव.. गाव.. त्यातली बेरोजगार मंडळी.. नाना.. त्याची बायको सोनाली.. त्याचा महत्वाकांक्षी पुतण्या.. त्यांचा बिनकामाचा पण काहीतरी कार्यक्रमाच्या शोधात असणारा ग्रुप.. त्यातला कवी.. पत्रकार.. फाट्यावर असणारं मात्र गावापासून लांब असणारं त्यांची ती नेहमीची टपरी.. मोबाईलच्या रिंग टोन्स.. मोबाईलवर सुरवातीला लांबूनच बोलतानाची नानाच्या पुतण्याची सवय.. त्याची साजनची रिंगटोन.. त्याचं एज फ्रेंड, एज सरपंच, एज गावकरी ही स्टाईल.. ट्रिपल सीट सर्रास होणारा प्रवास.. त्या मंडळींचं समरसून बीपी पहाणं.. त्यातला बेव़डा मास्तर.. त्याची त्याच्या बायकोशी मुलासाठी होणारी होणारी जुगलबंदी.. बायको रडायला लागल्यावर त्याची होणारी घालमेल.. गिरीषची आई.. त्याची प्रेयसी.. त्यांचे एकमेकांशी असलेले विनोदावर जाणारे पण प्रत्यक्षात श्रध्देवरच अघात करणारे सवाद.. त्यात सुंदर पावा वाजवणारे आणि गावापेक्षा अधिक माहिती आणि सखोल असेलेले अण्णा.. गिरीश आजारी पडला असताना त्याच्या डोक्याशी येऊन तोच तोच संवाद साधणा-या बायकांचा स्वभावविशेष.. गावातल्या महिला सरपंचांची प्रत्यक्ष स्थिती.. झेंडावंदनाला होणारी धावपळ.. सरपंचावर स्थानिक नेत्यांचा आणि आमदारांचा स्थानिक नेत्यांवर असलेल्या प्रभाव.. ग्रामीण भागात पत्रकारांची मोठी आणि आर्थिक हितासाठी असलेली भूमिका.. हे सर्वच त्यांच्या त्यांच्या पात्रांची सखोल ओळख , ग्रामीण महाराष्ट्रतलं अस्सलं जीवन.. त्यातलं नैराश्य.. आशेचे किरण... याचा धगधगता प्रवास पण काहीसा विनोदाच्या अंगानं जाणवणारा प्रवास पहिल्या सत्रात घडतो..
एका साध्याभोळ्या माणसाच्या दृष्टीकोनाचा राजकीय फायदा घेण्यासाठी मंदिर बांधण्याचा निर्णय झाल्यानंतर दुस-या पर्वात गावात आलेला बाजारीपणा.. मोबाईलच्या रिंगटोन्स ते घरातलं सामान.. कपडे.. फर्निचर.. बांधकाम.. बाजारीपणामुळं आलेला निगरगट्टपणा.. गावक-यांची हरवलेली शांतता.. कुटुंबात आलेला व्यावसायिकपणा.. हे सगळं दुस-या पर्वात छान जाणवून जातं.. त्यातही अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यानं हा फरक अगदी स्पषटपणे जाणवत राहतो.. गिरीषचं करडी गायीवर असणारं प्रेम.. तिचं या धंद्याच्या नादात देवात झालेलं रुपांतर यानंतर त्याचा होणारा उद्वेग. तिच्या देखभालीसाठी त्याचा तुटणारा जीव.. आणि या पार्श्वभूमीवर हे सगळं सत्य समोर येत असताना दत्ता दिगंबरा हे गाणं.. अगदी अंगावर आल्याशिवाय राहवत नाही..
याचा अर्थ सिनेमात हे सगळं रचणा-या मंडळींना कुणी खलनायक म्हणू शकत नाही.. त्यांच्या आणि गावाच्या विकासासाठी ही त्यांची योग्य भूमिका असल्याचा नाना आणि दिलीप प्रभावळकर यांचा संवाद.. अण्णांच्या भूमिकेत असलेल्या दिलीप प्रभावळकरांची तगमग.. शेवटी देवालाच कोंडल्यामुळं आणि करडी गायीच्या वियोगानं घायाळ झालेल्या गिरीषचा एकतर्फी संघर्ष.. त्याला वेडाच्या भरात भेटलेला नासीर.. व्वा व्वा त्या भूमिकेसाठी नासीरची निवड करण्याचं दाखवलेलं वेगळेपण.. त्याचं मूर्ती घेऊन पसारं होणं.. त्याचा देवाशी साधलेला भाबडा पण मोलाचा संवाद.. आणि मूर्ती विसर्जनावेळी दुसरीकडं होत असलेली मूर्तीची नवी प्रतिष्ठापना.. म्हणजे आता बाजार सुरुच राहणार .. याचा जाणारा संदेश.. आणि दुसरीकडं भाबड्या गिरीषच्या मनातल्या श्रद्धेचं, देवाचं झालेलं विसर्जन.. हे सगळचं तुम्हाला अंतर्मुख करायला लावणारं आहे.. एकीकडे गोंगाट.. एकीकडं शांतता.. मात्र तीही सखोल तत्ववेत्त्यासारखी.. वा.. बहोत खूब..
या सिनेमात एवढे दर्जेदार अभिनेते असूनही कुणाचा एकट्याचा अभिनय लक्षात राहत नाही.. याचं कारण टीम वर्क.. आणि प्रत्येक भूमिकेला मिळालेलं परफेक्ट स्थान.. सिनेमा संपल्यानंतर एक वेगळीच अंतर्मुख करणारी, आपल्या श्रद्धांना तडा देणारी.. त्यावर उपहासात्मक विडंबन म्हणून कुठेतरी आत विचार करायला लावणारी( प्रत्येचाच्या कुवतीनुसार ) प्रोसेस घेऊनच प्रेक्षक बाहेर पडतो.. आणि मला वाटतं हेच या सिनेमाचं यश आहे..
या संघर्षात तुमची घालमेल होते, तुम्ही रडता.. हसता.. पण तुम्हाला आत हे कुठेतरी अंतर्मुख करत रहातं.. आपल्या आजूबाजूला आणि आपणही काय करतोय याची जाणीव होत राहते.. हेच याचं गमक आहे.. सध्याच्या धावपळीच्या जगात आणि स्वतंत्र कुटुंबाच्या पद्धतीत कामातही शांतता मिळत नसताना, जगण्यातली धावपळ आणि गुंता सडवण्यासाठी आम्ही नवी सोफिस्टिकेटेड उपाय शोधून काढलेत.. आम्हाला मानसिक शांततेसाठी माऊली, तुकामाई किंवा पंढरपुरात जाण्यापेक्षा शिर्डी, शिंगणापूर, अक्कलकोट, गोंदवले, शेगाव, बांद्रा असे आमचे आम्ही उपाय शोधून काढलेत.. त्याच्यावर जाऊन अनेक बुवाबाजांची संगत आहेच.. त्यात लालबाग, सिद्धीविनायक, दगडूशेट साराख्यांची भर आहेच.. याशिवाय काशी, अयोध्या. प्रयाग, चार धाम, बारा ज्योतिल्रिंग, अष्टविनायक, अमरनाथ, लागलचं तर वैष्णोदवी, मानससरोवर.. याप्रत्येक तिर्थक्षेत्री जाऊन शांतता शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.. प्रत्यक्षात मात्र वास्तव काय आहे हे पाहण्याकडं आमचा कल नाहीच.. मग अशा अशांततेत तुमच्या मनातल्या श्रद्धेवरच प्रघात करणारा सिनेमा देऊन नक्कीच अनेक रंगांनी , उत्तम कलाकृती म्हणून , उत्तम आशय म्हणून अतिशय समृद्ध आहे.. एवढी हिम्मत दाखवून तुम्ही हे मांडलत.. त्यासाठी कष्ट घेतलेत.. हेच माझ्यासारख्या गरीब पामर मराठी प्रेक्षकासाठी समाधानाची बाब आहे.. म्हणून संपूर्ण टीमला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद..

Wednesday, October 26, 2011

डोंबिवलीकरांचा ‘फडके’ उत्साह



नाक्यावरची मित्र मंडळी नेहमीचीच... मात्र अशा अनेक नाक्या नाक्यांवरचे ग्रुप्स.. त्यात नुसतेच मित्र नव्हेत तर असंख्य मैत्रिणीही... तेही नव्या कपड्यांत.. नव्या उत्साहात... अशा हजारो जणांची एक एकत्र मैफल तीही रस्त्यावर.. रस्ता अडवून... असं अनुभवलंय कधी.. नाही मी पण नव्हतं अनुभवलं.. पण आज डोंबिवलीच्या फडके रोडवर लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं हजारोंच्या संख्येनं जमलेल्या तरुणाईचा उत्साह अनुभवला आणि दिवसभर तोच मनात घर करून राहिला... नव्हे फडके रोडवर जाण्यानं दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला...

गेल्या सात-आठ वर्षांपासून डोंबिवलीच्या फडके रोडवरच्या गुढीपाडवा आणि दिवाळीच्या गर्दीविषयी ऐकत होतो..टीव्हीवर पाहत होतो... त्यात काय नुसतीच गर्दी आणि लफडी अशी डोंबिवलीकर नसल्यानं असलेली एक उपेक्षित भावनाही त्यामागं होती.. मात्र आज या एकत्रित उत्सवाची काय मौज आहे.. नुसतचं एकत्र जमण्यापेक्षाही त्यातल्या जिव्हाळ्याची जाणीव झाली.. आणि इतकं वर्ष आपण आपल्या ठिकाणी हे मिस करत आलो.. असं खरोखरचं जाणवलं..

गणपती मंदिराच्या परिसरात आणि फडके रोडवर जमलेली हजारोंची गर्दी.. गर्दीचं सरासरी वय २० ते ४० वर्ष.. अनेक वर्षांनी एकमेकांच्या होणाऱ्या भेटी.. गर्दीतही मी इथे मॉर्डन कॅफेजवळ आहे.. तू तिकडे काय करतोयेस.. मी इथे मंदिराच्या बाहेर आहे.. असे आपुलकीनं एकमेकांसाठी घणघणणारे मोबाईल.. जिव्हाळाच्या मित्रांच्या गळाभेटी.. मैत्रिणींची आपुलकीनं होणारी चौकशी.. सध्या काय चाललंय, अशी होणारी विचारपूस.. काही जणांची गर्दीतही चाललेली, मात्र ग्रुपपुरतीच मर्यादित असलेली भंकस.. एवढी हजारो माणसं.. कोणत्याही निमंत्रणाशिवाय, केवळ आपुलकीच्या नात्यानं जमा होतात.. हे अप्रूप वाटलं..
सगळ्यात महत्त्वाचं जाणवलं तो म्हणजे निवांतपणा.. एरवी रहदारी आणि व्यवहारांनी गजबजलेल्या फडके रस्त्यावर पाय ठेवायलाही जागा नाही, अशी परिस्थिती.. सगळे व्यवहार ठप्प.. फक्त एकत्र जमलेली मंडळी आणि त्यांच्या एकमेकांशी चाललेल्या गप्पा.. एरवी लोकमध्ये शिरताना आणि डोंबिवलीत उतरताना दिसणारी प्रचंड नकोशी गर्दी एवढी सुंदरही असू शकते.. हे जाणवलं..
डोंबिवलीचं गणपती मंदिर हे या सगळ्यांना जोडणारं एक स्थान.. दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नानानंतर मंदिरात दर्शनाला येण्याची प्रथा.. पण त्याचं असं उत्साहात रुपांतर झालय... एरवी दिवाळी हा आपल्यापुरता, आपल्या कुटुंबाकरता फार तर आपल्या काका, मामा अशा नातेवाईकांसाठी साजरा होणारा सण इतक्या मोठ्या गर्दीत आपुलकीनं, जिव्हाळ्यानं साजरा होऊ शकतो.. हेच अधिक आवडलं.. आपआपल्या शहरातंही आपण असे एकत्र येऊ शकत नाही का.. असा प्रश्नही मनाला पडला..
एवढी गर्दी असतानाही या गर्दीला एक स्वयंशिस्त होती.. एरवी गुढीपाडव्याला इथं जमणारी मंडळी ही कुठल्यातरी संस्थांशी संबंधित असतात.. किंवा त्या मागे एक मोठी यंत्रणा कार्यरत असते..मात्र नरक चतुर्दशीच्या दिवशी या ठिकाणी जमलेली ही गर्दी स्वयंस्फूर्तीची असते.. गर्दीत काही जण काळे-गोरे असणारच मात्र ती सर्वांना त्रासदायक नक्कीच नव्हती.. एवढ्या तुडुंब गर्दीतही रस्त्यावरच्या मोठ्या रांगोळीचं महत्त्व सगळ्यांनाच माहित होतं.. आणि एवढ्या गर्दीतही फटाक्यांच्या माळा फुटल्यानंतरही कोणीही त्याबाबत साधा आक्षेप घेत नव्हतं..सगळेचजण एकमेकांच्या आनंदाच्या आड येणार नाहीत याची दक्षता स्वत:हून घेत होते..
जगात नाती विरळ होत असताना.. संवाद साधावा अशी माणसं शोधावी लागत असताना केवळ एकमेकांसाठी वर्षभरातून तरी फडके रोडवर भेट होईलच या आशेपोटी हजारो मंडळी इथं आवर्जून एकत्र येतात.. यातली काही मंडळी चांगल्या हुद्द्यावर असतील.. एरवी धावपळीतही असतील.. पण गाड्या बाजूला ठेऊन पायी फिरून या आपुलकीच्या भेटी नक्कीच वर्षभरासाठी पुरून ठरणाऱ्या असतील.. उदा.. एखादी राहून गेलेली प्रेमाची भरलेली जखमही याच गर्दीत कुठेतरी कडेवरच्या मुलासह दिसली.. आणि आपलं लग्नही झालेलं असलं तरी तिच्या त्या एका लूकमुळं पुढच्या वर्षभराची उमेद नक्कीच जखमेवरच्या खपलीसह मिळत असेल.. नाही का..
इथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही सादर होतात आणि त्यातही तोल ढळू न देण्याचा प्रयत्न प्रकर्षानं दिसून येतो.. हे शहराच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारं आहे.. मराठी रॉकस्टारही जिथे रॉकच्या साथीनं अभंग सादर करतात.. आणि त्यांना मिळणारी दादही तेवढीचं निर्मळ असते... फक्त खंत एकच डोंबिवलीकर नाही ही खंत सतत फिरताना जाणवत राहिली.. आपल्या ठिकाणीही ही अशी मंडळी एकत्र जमावीत.. जगातला चांगुलपणा संपत असताना, कुठेतरी निर्मळपणे असा एक तरुणाईचा स्वयंस्फू्र्तीचा उत्सव साजरा होतो याचं मनापासून कौतुक वाटलं..
परतताना स्टेशनवरच्या ब्रिजवर एका भिकारणीला दोन रुपये देऊन, तिला हॅपी दिवाळी करणारा एक डोंबिवलीकर, ओळख नसतानाही आपला वाटला.. फडके रोडवर गेलो नसतो..तर एक वेगळा आनंद गमावला असता हे जाणवलं.. आणि एवढ्या हजारोंची ऊर्जा घेऊनच घरी परतलो..

Saturday, September 24, 2011

अण्णांपासून मोदींपर्यंत..

गेल्या चार पाच वर्षांपूर्वी लोकलमध्ये प्रवास करत असताना भाजपचे (तेव्हाचे की पूर्वीचे) विधानपरिषद सदस्य अशोकराव मोडक फर्स्ट क्लासच्या डब्यात भेटले होते.. (विशेष म्हणजे आमदार असूनही अशोकराव लोकलमधून प्रवास करत होते) त्यांना मी दोन प्रश्न विचारले.. एक आणीबाणीनंतर किंवा स्वातंत्र्योत्तर काळानंतर देशातलं संस्थात्मक काम कमी झालय का?, ( म्हणजे सरकारव्यतिरिक्त इतर स्वयंसेवी संस्था एनजीओ नव्हेत.. तर देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा धरुन सामाजिक कामात उतरलेल्या संस्था ) आणि
दुसरा प्रश्न मोडक हे रा. स्व. संघाशी संबंधित असल्यानं की संघटनेला नवी माणसं मिळेनाशी झालीयेत का ?.. त्यांनी नेहमीच्या संघआच्या पद्धतीनं डॉक्टर आणि गुरुजींवर आणत हा विषय संपवला, मात्र ठोस उत्तर त्यांच्याकडेही नसावं..

स्वदेशी जागरण मंचाचे राष्ट्रीय संघटन मंत्री एकदा मला हैद्राबादच्या प्रवासात भेटले होते त्यांना मी हाच प्रश्न विचारला होता.. त्यांचं नाव आता विस्मृतीत गेलय. ( मोडकांना भेटण्यापूर्वी दोन वर्षांपूर्वी ) तर ते म्हणाले बरोबर आहे.. पण त्यांनी मला प्रमोद महाजनांचं उदाहरण दिलं होतं.. ते म्हणाले प्रमोदजी भाजपचे बडे नेते असणं तुम्हाला योग्य वाटतं का.. ( म्हणजे त्यांचा प्रमोदजींना थोडक्यात विरोध असावा ही शक्यता) .. आणि या सगळ्याचं समर्थन करत म्हणाले होते की संघटनेत नेहमी फ्लोटिंग पॉप्युलेशन असतं त्यामुळं नवी माणसं येईपर्यंत जुन्यावर भागावावं लागणारच..
हे सगळं आत्ता सांगण्याची गरज म्हणजे अण्णांच्या आंदोलनानंतर देशासाठी काहीतरी करावं.. अशी इच्छा असणारे बरेच जण आहेत हे लक्षात आलं... खरे-खोटे हे नंतर ठरवू मात्र ही व्यवस्था बदलण्याची इच्छा असलेले अनेक तरुण या आंदोलनात निर्विवाद सहभागी झाले.. मग त्याची कारणं काहीही असोत... प्रसंगी अण्णांच्या सांगण्याप्रमाणे तुरुंगात जाण्याची यातल्या कितीजणांची तयारी होती, याबाबत साशंकता असली, किंवा यात सहभागी होणा-या व्यक्तिंच्या सद्भावनेबाबत हेतू असला, तरी अण्णांना दिल्लीसह देशभरात जनमानसातून खूप काही ठोस पाठिंबा आहे, हे चित्र रंगवण्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया यशस्वी ठरला.. यामुळं आधीच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर अडचणीत सापडलेल्या युपीए-2 सरकारसमोरच्या अडचणी वाढल्या.. वगैरे..वगैरे..
अण्णांच्या आंदोलनाचं फलित काय, तर यानिमित्तानं देशासाठीही विचार करायचा असतो, हे आत्ममग्न असलेल्या मध्यमवर्गियांना समजलं.. तसचं एक फाटका माणूस संपूर्ण देशाच्या यत्रणेला आव्हान देऊ शकतो हेही अण्णांच्या आंदोलनानं पुन्हा एकदा दाखवून दिलं... तिसरं महत्त्वाचं मत न देणारा एक मध्यमवर्गीय समाज या निमित्तानं जागृत झाला.. या आंदोलनाची जेपींच्या आंदोलनाबरोबर जरी तुलना केली असली किंवा संघाच्या पाठिंब्याची किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे आंदोलन यशस्वी झाल्याची जरी चर्चा झाली असली, तरी मी आधी म्हटल्याप्रमाणे देशाबाबत कुणाचालाच काही वाटतं नाही, असं नसल्याचं या आंदोलनातून दिसून आलं..
अण्णांचं आंदोलन संपल्यानंतर दोन तीन दिवसांच्या प्रसिद्धीनंतर अण्णा पुन्हा अडगळीत किंवा चांगल्या शब्दात राळेगणात गेले खरे.. पण यानिमित्तानं भाजपला जोर चढला.. देशात निर्नायकी अवस्था असताना आता या पोकळीचा फायदा कुणाला मिळणार याचे आडाखे बांधण्यास आणि त्यावर दावे सांगण्यास चढाओढ सुरु झाली.. अडवाणी यांनी जाहीर केलेली रथयात्रा किंवा सुप्रीम कोर्टाच्या साध्या दिलाशानंतर मोदींनी केलेला तीन दिवसांचा उपोषणाचा इव्हेंट यातून आता भाजपात सुंदोपसुंदी रंगू लागल्याचं समोर आलं...
खरतरं अण्णांचं आंदोलन सुरु असतानाच एक दिवस मोदींना दिल्लीत बोलवून त्यांची गडकरींसह एक बैठक घेऊन, एक साधी पत्रकार परिषद भाजपनं घडवून आणली असती तरी मोदींच्या पंतप्रधानपदाच्या चर्चेला ऊत आला असता.. यावेळी मोदींनी एका रथयात्रोची घोषणा करावी अशी माझी सूचना होती.. हे मी माझ्या काही सहका-यांपाशी बोललोही होतो.. त्यानंतर अडवाणींनी रथयात्रेची घोषणा करुन आपण चर्चेत असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं.. तर अण्णांचीच आयडिया वापरुन आपणही प्रसिद्धी मिळवू शकतो हे मोदींनीही दाखवून दिलं. खरतरं एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांला सुप्रीम कोर्टानं दिलेल्या साध्या दिलाशानंतर
( म्हणजे याला दिलासा म्हणायचं की नाही यावरही वाद आहेत) त्याचा लगेच पंतप्रधानपदासाठी दावा सांगण्याचं दुर्देवी काम मीडियाला करावं लागलं... याच मीडियानं 2002 साली गुजरात दंगलीनंतर मोदींना टीकेचं प्रचंड लक्ष्य केलं होतं... मोदींनी मध्यंतरी गुजरातमध्ये केलेल्या कामाचं किंवा सध्याच्या निर्नायकी अवस्थेचं हे फलित असावं.. यात विजय मोदींचाच झाला..
अण्णांच्या आंदोलनानंतर सरकारविरोधात वातावरण तापलेलं आहे, 2 जी घोटाळ्यात तर आता चिदंबरम आणि पंतप्रधानांचं नावही येऊ घातलय.. सोनिया गांधी आत्ताच कॅन्सरसारख्या दर्धर शस्त्रक्रियेनंतर देशात परतल्या आहेत... आणि अण्णांच्या आंदोलनानं कितीही जनमानसानतला राग पेटलेला असला, तरी याचा फायदा अण्णा निवडणुकांत घेऊच शकत नाही हे वास्तव आहे.. कारण आंदोलन आणि राजकारण किंवा निवडणुकांची गणित वेगवेगळी असतात हे नक्कीच... आता याचा फायदा भाजपलाच मिळणार आहे.. कारण सध्यातरी ठोस पर्याय दिसेनासा आहे.. डाव्यांची ताकद प. बंगालच्या पराभवानंतर घटलेली आहे, तर दुसरा कोणताही सबळ राजकीय राष्ट्रीय पक्ष सध्या अस्तित्वात नाही.. फक्त त्यांनी अंतर्गत सुंदोपसुंदी मिटवून ही शेवटची संधी घेतली तर ठीक... आत्तापासूनच मोर्चेबांधणी केली नाही तर पुन्हा गेल्या दोन निवडणुकांपेक्षा भाजपची कठीण परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही..
अण्णांचं आंदोलन ते मोदींची पंतप्रधानपदाची उमेदवारी हा असा सगळा प्रवास आहे.. मोदींची उमेदवारी किती योग्य वा अयोग्य हे जनता ठरवेलच.. मोदीही दंगलींपेक्षा राष्ट्रीय विकासाकडेच पाहतील.. मात्र अण्णांच्या आंदोलनाचं हे असं फलित होणं, हा कुठला न्याय आहे.. .. हीच लोकशाही आहे काय ?

Sunday, March 13, 2011

रविवारची फिस्ट...











शनिवारची उशिराने झालेली रात्र... रविवारची पहाटे 10 पर्यंतची साखरझोप.. चहाच्या पेल्याबरोबच मित्रांचे आलेले फोन... आणि मग विनाअंघोळीची बाईकवरुन किंवा कारमधून लांबवर कुठेतरी मारलेली रपेट.. मग सगळ्या चर्चा , गंमत संपल्यानंतर पोटात झालेली भूकेची जाणीव... आणि मग कुठेतरी फक्कड ठिकाणी
नाश्ता म्हणताना सगळयांनीच आटोपलेलं जेवण... रविवारच्या सुखाची कल्पना ही माझ्यासाठी अशी आहे.
रोजच्या धकाधकीत दोन-तीन तास लोकलने झालेला प्रवास आणि मुंबईचं तेचतेच दर्शन, यामुळं मरगळलेल्या मनाला पुन्हा जिवंत करणारी ही भटकंती आणि नवे विचार यासारखी गंमत नाही.. शनिवारी रविवारी या दोन दिवसाच्या सुट्टीत लोकलने मुंबईच्या दिशेने प्रवास करायचा नाही, असा आमच्या काही मित्र मंडळींचा पण आहे.. तसचं आठवड्यात कामाच्या वेळी कुठेही म्हणजे मुंबईत, ठाण्यात, नवी मुंबईत, पुण्यात, नाशकात अशा आसपासच्या ठिकाणी असलेली ही मंडळी शनिवारी आणि रविवारी मात्र न चुकता बदलापूरकडं धावत असतात.. एरवी सकाळई दहाच्या सुमारास लोकलनं रिकामं केलेलं बदलापूर शनिवारी आणि रविवारी मात्र फुलून आलेलं असतं. प्रत्येकाच्या ठरलेल्या नाक्यावर कोणत्याही घरच्या कपड्यांत तासनतास एकमेकांशी सिगरेटी, चहांची देवाणघेवाण करत गप्पा मारत बसलेली तुम्हाला नक्की दिसतील.. बर एरवी यातली बरीशची मंडळी त्यांच्या त्यांच्या कामाच्या ठिकाणी चांगल्या पोस्टवर असलेली..तरीही त्यांची कोणतीही भीडभाड न ठेवता शनिवारी आणि रविवारी मात्र हे बदलापूर सुख लुटायला सगळेच येतात.. यामागं असतं बदलापूरचं प्रेम.. एरवी कोणीही बदलापूर लांब म्हणून त्याला टाकून बोललेलं या मंडळींना आवडत नाही, कारण त्यांना बदलापूरची मजा ठाऊक असते..
शहरी आणि ग्रामीण अशी दोन्ही रुपं धारण केलेलं बदलापूर म्हणूनच मग सगळ्यांचं वीक एन्ड डेस्टिनेशन असंत.. कुठेतरी तळ्यावर, मुळगावच्या खंडोबाच्या मंदिरात, बारवी डॅम परिसरात, तिथून पुढे टिटवाळा ते थेट माळशेजपर्यंत, तर कुठे कोंडेश्वर, कुठल्यातरी रेनी रिस़ॉर्टवर, वांगणी, नेरळ, कर्जत ते पार खंडाळा लोनावळ्यापर्यंत बदलापूरकरांना फिरायला फार आवडतं.. आणि मग त्यातही कोणी ऑफिसची मित्र मंडळी आली तर धम्मालच.. बदलापूरकरांमध्ये असचं एक आवडतं ठिकाण म्हणजे मुळगाव.. बदलापूरपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावानं अजून आपलं गावपण टिकवून ठेवलय.. तशी आजूबाजूची गावही आहेतच, मात्र इथला खंडोबा आणि मामांचं हॉटेल हे बदलापूरसाठी मुख्य आकर्षण..
बारवी डॅमकडे फिरायला गेलेल्या सगळ्याच मंडळीचे पाय या टपरीवजा ह़ॉटेलकडे नक्की वळतात.. मोठमोठ्या चारचाकी गाड्या इथं थांबतात.. आणि मग सुरु होते खाद्ययात्रा.. गरमागरम गरम वडे आणि त्यासोबत असणारा ठेचा हे या ठिकाणचं खास वैशिष्ठ्य.. त्याचबरोबर मग जबरदस्त तर्री असलेली मिसळ वगैरै सोबतीला आलचं.. मुख्य अट एकच तिखटं खाण्या-यांनीच या ठिकाणी यावं..
उकडलेल्या बटाट्यात हळद, कोथिंबीर, थोडासा ठेचा याचं तयार केलेलं मिश्रण, डाळीच्या पिठातून काढून तेलाच्या कढईत टाकलेले वडे आणि गि-हाईकांची वर्दळ आणि मामांकडून गि-हाईकांचं होणारं स्वागत.. यामुळं एक मजाच याठिकाणी असते.. बरीच मंडळी या ठिकाणी वड्यांवर आणि रश्यावर ताव मारत बसलेले असतात.. पूर्वी लहान असलेल्या या हॉटेलचा आता बराच विस्तार झआला आहे. पूर्वी ठेचा आणि वड्यापुरतीच मर्यादा होती, आता त्यात चिकन आणि मटन थाळीही आली आहे.. पण एवढं होऊनही मुख्य वड्याकडे दुर्लक्ष झालेलं नाही आणि फारसा झगमगाटही आलेला नाही. त्यामुळे या वाटेवर आलं की इथं मंडळी हटकून थांबतातच..
मग मित्रांच्या गप्पा, मस्करीत पावांचा आणि वड्यांचा हिशेब ठेवणं अवघड जातं, बिसलेरीच्या थंड पाण्याच्या बाटल्या येतात.. उसळीच्या वाट्यान वाट्या येतच राहतात, तिखटं न खाण्या-याची खेचली जाते.. थोडसं हा हू करत का होईना, रुमाल काढत तोंड पुसतं मंडळी अक्षरश तुटून पडतात.. मग हा नाश्ता आहे हे भानही संपतं आणि मग या वड्यावर, ठेच्यावरच जेवण होऊन जातं.. हे कुणाच्या लक्षातही येत नाही.. इथला ठेचा तर टेस्ट करुन बघावा असाच.. ते त्याला चटणी म्हणतात पण आहे प्रत्यक्षात ठेचाच.. तेलानं माखलेल्या प्लेटमध्ये हिरव्या मिरच्यांचा हा ठेचाच या जेवणाला अधिक रंगत आणतो..
चला तर मग कधी येताय बदलापूरला या फिस्टचा अनोखा आनंद लुटण्यासाठी..