Monday, May 5, 2008

एक शून्य मी...

पुलंचा एक शून्य मी हे पुस्तक वाचतोय.. त्यात एक शून्य मी.. नावानं पुलंनी एक ललित लिहलय.. फारच सुंदर आहे.. कित्येक वेळेला आपल्या आजूबाजुच्या माणसांमध्ये राहताना आपण खरचं या माणसांमधले आहोत का हा प्रश्न सल करत राहतो..
कित्येकदा ही मंडळी अशी असतात की ती आपली बालपणापासूनची खास असतात.. त्या वेळेला त्यांच्यातलं जे भावणारं असतं, कदाचित ते आत्ताच्या काळात आपल्याला भावत नाही, काही गोष्टींवरुन मनातल्या मनातच खटके उडत राहतात.. आपण जिथे जिथे वावरतो कुटुंबात, ऑफीसात त्या त्या ठिकाणी हे सलत राहतं.. पुलंनी हे खूप छान मांडलय... पुलंनी त्यात म्हटलय की आपल्या अवतीभवतीची अनेक चांगली मंडळी आपल्याला भेटली ती कधीकधी आपल्याला भावली, पण हे सातत्य ब-याचदा राहत नाही.. हेही खरचं.. यात पुलंचा लेख वेगळा असू शकतो आणि माझं मत त्याही पेक्षा वेगळं असू शकतो.. फक्त तो ललित लेख एक निमित्त आहे एवढचं...
ब-याचदा एखाद्या ग्रुपमध्ये असूनही आपण तिथे नाहीच असं वाटतं राहतं.. काहीतरी आपल्याला अभिप्रेत असणारं, आपल्यासाठी आदर्श असणारं इथे काही घडतचं नाही असंही वाटतं.. मग आपण इथे का आहोत असे प्रश्न समोर येतात.. कधीतरी नाहक जगत रहावं लागतय... असंही वाटतं राहतं.. आपण जगण्यात जसजसे खोलखोल जडात राहतो..तसतसा अधिकाधिक गाळच आपल्या हाती राहतो, की काय असं वाटायला लागतं.. समजूतदार वाटणारी माणसं एकदम अनोळखी वागायला लागतात.. आणि आपण हे सगळं समजून घेऊ शकतो म्हणून स्वत:चाच राग राग होतो... पण या सगळ्याला काहीच उत्तर नसतात..हे ही खरचं.. हे सगळं सोडून निघून दूर कुठेतरी जाण्याची कुवतच आपण गमावून बसलोय असं वाटतं राहत.. आणि रिकामेपण अधिक भारुन येतं..
मग सुट्टीच्या दिवशीही कुणाला भेटावसं वाटत नाही, माणसं तेवढ्या वेळापुरतीच पुरेशी वाटतात.. आपले अग्रक्रम निश्चित करुन तसचं रहायला आवडतं.. नेहमीच्या हक्काच्या नाक्यावरही तिचं तीचं माणसं भेटतील म्हणून जाणं टाळावसं वाटतं..
याला कधीतरी आपला जादा शहाणपणा कारणीभूत आहे असं वाटतं... पण रमावं असं खरंच हाती लागत नाही म्हणून आणि पर्याय नाही म्हणूनही तिथे जाणं टाळता येतं नाही..मग सगळ्यांमध्ये असूनही सलतच राहतो.. तो आपला आतला एकटेपणा.......
पुलंनी म्हटलय आपल्याला न आवडणा-या गोष्टी किंवा समाज विघातक गोष्टी आजूबाजूला घडताना शून्यांची बेरीज तेवढी होत राहते...
एखाद्या ठिकाणी कसलातरी अस्वाद घेताना नाहकच मनात एखादा वेगळाच सामाजिक वगैरे विचार डोकावतो.. डोळे क्षणभर पाणावतात.. पण परत वास्तवात येताना ही संमिश्र मनस्थिती का .. हा प्रश्न राहतोच राहतो.. पुलंनी हे सगळं खूप ठळकपणे मांडलय खरं.. मला ते बहुधा जमत नाहीये.. पण ते खूप आतं भावलं असं वाटलं.. कुणीतरी मनातलं लिहलय.. असंही..