Tuesday, September 9, 2008

झाडाझडती..

काही दिवसांपूर्वीच विश्वास पाटलांचं झाडाझडती वाचलं... पाटलांचंच पांगिरा, राजन गवस यांचे तणकट, बारोमास या सगळ्यांची एक शृंखला आहे.. या सगळ्यातून महाराष्ट्रातल्या पिडीत समाजाचं खूप चांगलं चित्रण झालंय. असं मला वाटतं. झाडाझडती तर फारच विषण्ण करत. ग्रामीण भागातील व्यवस्था, हेवेदावे, राजकीय राडेबाजी आणि या सगळ्यात भरडला जाणारा सामान्य माणून तुम्हाला पिळवटून टाकतो..
पुस्तकाची रेंज फारच मोठी आहे, कॅनव्हास खूप मोठा आहे.. एवढी पात्र.. त्यांचं आयुष्य हे पुस्तक संपेपर्यंत कुठेही निसटत नाही हे विशेष.. आंबेपूर जिल्ह्यातल्या धरणाच्या प्रकल्पग्रस्तांवर होणा-या अन्यायाची ही कहाणी आहे.. त्यातली सगळी पात्र इतका अन्याय आयुष्यभर सहन करतात, हैबती, त्याची आई आवडाई, खैरमोडे गुरुजी , गुणवंता, शिवराम त्याची विधवा पत्नी, या सगळ्यांशी आपली एक नाळ पुस्तक वाचताना जुळून जाते.. एका वेगळ्याच पण वास्तव जगात हे पुस्तक आपल्याला घेऊन जातं, जागतिकीकरणाच्या काळात अंतर्मुख करणारं हे पुस्तक आहे..
कांदबरीतले दोन प्रसंग फारच अंगावर येतात, पहिलं सोपान मामा याचा मृत्यु झाल्यानंतर झांजववाडीला त्याचा मृतदेह नेताना होणार त्रास कुणालाही दडपायला लावणारा आहे. आणि दुसरा कुशाप्पा राजाचा मुलीच्या लग्नासाठी वाघाच्या शिकारीला जाण्याचा प्रसंग आणि त्यात त्याच्या हातात काहीच न पडणं हे फारच त्रास देणारं आहे.
खासदार, त्यांचा मुलगा, दत्तू सरपंच आणि त्यांचा चमू यांच्यासारखी हरामखोर मंडळी आपल्या आजूबाजूला असतात, पण त्याचं इतकं वास्तव चित्रण कुठेही आढळत नाही. विशेष म्हणजे विश्वास पाटलांचं ग्रामिण भागातला, शेतीतला, बोलीतला अभ्यास खूप प्रकर्षानं जाणवतो. ते स्वत जिल्हाधिकारी आहेत, त्यामुळे त्यांना हे अनुभव नक्कीच आले असतील, मात्र सामान्य माणसांमध्ये समरसून जाऊन, एसी केबीनमध्ये केवळ न राहता, त्यांनी या कादंबरीसाठी घेतलेला विषय हे सगळचं भारावून टाकणारं आहे. ही माणसं एवढं सहन करुन जिवंत कशी राहतात, असा प्रश्न शेवटी शेवटी पडत जातो. आपण काय करतोय, समाजाची काय स्थिती आहे, आपण गुरुजी का होऊ शकत नाही, त्या वणव्यात टिकू शकतो का, असे अनेक स्वतलाच हलवणारे प्रश्न हे पुस्तक वाचल्यानंतर समोर उभे ठाकतात.. मन फार विषण्ण होतं.. पुस्तक वाचत असताना सुमारे पाच दिवस माझ्या कामात माझं अजिबात लक्ष नव्हत.. सारखे पुस्तकातील पात्रे आठवून मन पिळवणूक निघायचं.. एवढी सुंदर कलाकृती उशीरा वाचनात आली, याची खंतही वाटली. एक विषण्णता घेऊनही, इतका वास्तवादी अनुभव देणा-या विश्वास पाटलांना म्हणूनच सलाम, ही माणसं त्यांना भेटली होती का, असा प्रश्न विचारावासा वाटतो.
एकाअर्थी सपूर्ण समाजव्यवस्थेची झाडाझडती घेणारं हे पुस्तक प्रत्येकानी वाचायला हवं, हे नक्की