Thursday, June 18, 2009

मिसळ..


मटकीची उसळ.. त्यात बटाट्याची भाजी.. त्यात टाकलेलं फरसाण ..सोबतीला लाल तर्री.... आणि पाव.. सुटलं ना तोंडाला पाणी.. मस्त थंडीच्या मोसमात अशी मिसळ ज्याच्या उदरात पडते.. त्याला नक्की येणारच की तृप्तीचा ढेकर...
वयाच्या नवव्या दहाव्या वर्षापासून मी या मिसळीच्या प्रेमात आहे... आमच्या गावी म्हणजे माझं लहानपण जिथे गेलं तिथे हॉटेलांमध्ये फक्त सकाळच्या वेळातच मिसळ मिळते.. म्हणजे ज्या हॉटेलात चांगली मिसळ मिळते त्या हॉटेलात सकाळी आठ वाजता नंतर मिसळ मिळत नाही.. म्हणजे कल्पना करा मिसळचे खवय्ये किती पहाटे उठून या मिसळीसाठी येत असतील.. गंमत जाऊ द्या पण पश्चिम महाराष्ट्रात आजही अनेक गावांमध्ये फक्त सकाळीच मिसळ मिळते.. सकाळी आजूबाजूच्या परिसारातून दूध घेन, भाज्या घेन गावात येणारे या मिसळीवर पहाटेच यथेच्च ताव मारतात..
आमच्या लहानपणी बाहेर हॉटेलात खाणं हे पाप समजलं जाई.. आणि पुणे-बई असा प्रवास झालाच तर हॉटेलात काही खाता येत असे.. अश्या काळात गावात जाऊन मिसळ खाणे असा योग मला आला.. आणि त्या दिसापासून आजपर्यंत इतक्या मिसळींचे फ्लेवर जिभेवर ठेऊनही हा पदार्थ मला अतिशय प्रिय आहे..

ज्या कोणी या मिसळ या पादार्थाचा शोध लावला असेल.. त्याला त्या लाल तर्रीचा सलाम..
आजही राज्यात कोणत्याही गावात गेलं तरी त्या गावची मिसळ खाण्याची प्रथा मी सुरु ठेवली आहे.. म्हणजे पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे, कोल्हापूर या सगळ्या गावांतील मिसळीचा त्यांचा त्यांचा एक स्वाद आहे.. पुण्यातल्या दोन तीन हॉटेलातली मिसळीची चव तर विसरुच न शकण्या पलिकडची आहे(म्हणजे आता नावं आठवत नाहीत.. त्यातलं एक तुळशीबागेत आहे.. भूलचूक माफ) मी राहतो बदलापुरात त्यामुळे आसपासची ठाण्यातील मामलेदारची, डोंबिवलीतील मुनमुनची, बदलापुरातील काटदरेंची मिसळ म्हणजे साक्षात परमेश्वराने भूतलावर पाठवलेलं अमृत आहे.. असं मी मानतो.. वांगणीतली मिसळ, नेरळच्या रेल्वे कँटीनची मिसळ, कर्जत स्टेशनाबाहेरच असलेल्या कौलारु हॉटेलातील मिसळ या सगळ्यांची चव म्हणजे वाहवाच..
जे खरोखरच खवय्ये आहेत..त्यांना एवढं सांगणही पुरे..