Friday, December 26, 2008

एका महिन्यानंतर...

रात्री साडे नऊची वेळ.. विकली ऑफ असल्याने निवांत होतो. बातम्यांशी संबंधित नोकरी असल्याने निवांत बातम्या बघत सुट्टी चालली होती.. तेवढ्यात कुठल्यातरी न्यूज चॅनेलला लिओपोर्ड कॅफेत गोळीबार झाल्याची बातमी आली. त्यानंतर शहरात काही ठिकाणी गोळीबार झाल्याचंही वृत्त होतं.. मी सरसावून गँगवॉर असेल असं समजून टीव्हीसमोर बसलो.. पाहता पाहता हे गोळीबार साधे नसून दहशतवादी हल्ले असल्याचं स्पष्ट व्हायला लागलं.. इतकचं काय तर आपल्या नेहमीच्या व्हीटी स्टेशनवर अंदाधुंद गोळीबार झाल्याच्या आणि बॉम्बस्फोट झाल्याच्याही बातम्या आल्या. आणि खूप मोठा धक्का बसला.. व्हीटी स्टेशन, कामा हॉस्पीटल, मेट्रोजवळ गोळीबार, विधानभवनाजवळ ग्रेनेड हल्ला., विलेपार्लेत टॅक्सीत स्फोट, माझगावात टॅक्सीत स्फोट.. ताज, ओबेरॉयवर हल्ला, नरिमन हाऊसमध्ये अतिरेकी लपले. अश्या बातम्या सारख्या येतच होत्या.. आणि जेवणाची ताटं सारुन त्या रात्रभर मी आणि माझ्या घरातले टीव्हीसमोर अक्षरश: रात्रभर बसून होतो... ज्या व्हीटी स्टेशनवरुन गेले तीन वर्ष रात्री 10.30 ते 11.30 च्या काळात आम्ही बिनघोर येत होतो, ज्या विधानभवन परिसरात नोकरीला होतो, त्याच परिसरात हे सगळं घडलं.. आणि कुठेतरी आत खूप आत एक जबरदस्त धक्का बसला.. कदाचित व्हीटी स्टेशनवर झालेल्या गोळीबारात आपणही मेलो असतो हे जाणवलं.. आणि सुन्न झालो.
आम्ही एक सार्वभौम, गेल्या 50 वर्षांपासून स्वतंत्र आर्थिक प्रगतीच्या शिखराकडे वाटचाल करणा-या देशाचे नागरिक आहोत, देशातल्या सर्वात सुरक्षित शहरात आहोत, इथे आम्हाला कुणाचीही भिती नाही या सगळ्या मनातल्या असलेल्या भावनांचा एका क्षणात हल्ल्याच्या जाणीवेनं चक्काचूर झाला. कुठल्यातरी इतर देशातील कोणीतरी आमच्या देशात समुद्रमार्गाने घुसतात काय, व्हीटी स्टेशनवर हल्ला करुन निरपराध 50-60 लोकांचे जीव घेतात काय आणि आमच्याकडची सर्व सुरक्षायंत्रणा याला अपुरे पडते काय.. सारचं अनपेक्षित... खरं सांगा महिन्याभरापूर्वी व्हीटी स्टेशनवर असा सरसकट गोळीबार होईल, असं कुणी सांगीतलं असतं तर कुणाला तरी खरं वाटलं असतं का हो.. खरंच सगळ्यांनाच मुळापासून हादरवणारी ती 26 नोव्हेंबरची रात्र होती. कुणीच था-यावर नव्हतं. नेमके किती दहशतवादी आहेत, त्यांचं उद्दिष्ट्य काय, ते कुठेकुठे हल्ले करणार आहेत, कुठल्या देशातले आहेत.. किती आरडीएक्स आहे.. हे सर्व प्रश्न फक्त गुंता बनून होते.. प्रशासकीय यंत्रणाही मूकपणे हे सगळं पहात होती. ज्या पोलीस अधिका-यांनी हे थोपवायचा प्रयत्न केला. ते चांगले शूर पोलीस अधिकारी आम्ही गमावून बसलो... हेमंत करकरे, विजय साळस्कर, अशोक कामटे हे तिन्ही अधिकारी एकाचवेळी हल्ल्याला सामोरे जाताना मृत्युमुखी पडतीलं, हेही कुणाला स्वप्नातही खरं वाटलं नव्हतं.. तीही बातमी आम्ही पचवली, मात्र या तिन्ही पोलीस अधिका-यांच्या मृत्युने दहशतवादाचं संकटाची तीव्रता अधिक वाढली. त्यानंतर या दहशतवाद्यांपैकी एकाचा फोटो प्रसिद्धीला आला. तोच तो कसाब.. त्याच्या चेह-यावरचे खूनशी भाव संपूर्ण मानव जातीला काळीमा फासणारे होते.. त्याच्या नजरेतलं क्रौर्य अजूनही त्याच तीव्रतेने आमच्या सगळ्यांच्याच स्मरणात आहे.. कितीतरी दिवसांपासून असलेला माणसं अशी का वागतात, हा प्रश्न अजूनही सुटलेलाच नाही. त्यानंतर दोन दिवस ताज, नरिंमन हाऊस आणि ओबेरॉयमधला दहशतवाद्यांचा मुकाबला आम्ही निमूटपणे पहात होतो. अखेरीस हल्लेखोरांना यमसदनाला धाडलं.. मात्र आम्ही सुरक्षित नाही..याची जाणीव मात्र या हल्ल्यानं आम्हाला फार तीव्रतेने करुन दिली. आत्तापर्यंत कितीतरी स्फोट झाले, तरी असे एकाचवेळी अनेक ठिकाणी हल्ले करण्याची आणि जिवंत दहशतवाद्यांनी गोळ्यांनी संपूर्ण यंत्रणेला धारेवर धरण्याची ही पहिलीच वेळ.. त्यामुळे जनता घाबरली, पोलीस गांगरले.. संपूर्ण यंत्रणा हादरली.. मात्र ती भीती आजही आमच्या मनात तशीच कायम आहे.. मुंबई नंतर एका दिवसात उभी राहिली, अश्या कितीजरी बातम्या आल्या, तरी ती आमची गरज आहे.. आम्ही निर्लज्ज आहोत. बाहेर पडलो नाही, तर आजच्या स्पर्धेच्या युगात जेवायचं काय, हा प्रश्न आमच्यासमोर पडेल. त्यामुळे अपरिहार्यतेतून मुंबई उभी राहिली, त्यात कोणताही आत्मविश्वास नाही. अजमल कसाब आणि इतर नऊ जणांची ( की अधिक काही जणांची) आमच्याशी काय दुश्मनी होती, हे आम्हाला आत्तापर्यंत कळलेलं नाही. आम्ही त्याच शोधात आहोत. आम्हाला मरण मान्य आहे, मात्र अश्या भ्याड पद्धतीनं आणि दुस-या कुणाच्या तरी गोळीनं किंवा बॉम्बस्फोटानं नको.. हे आक्रंदून सांगणा-या व्हेनस डेतल्या नसरुद्दीन शाहसारखी आमची अवस्था आहे. मात्र चित्रपटात शक्य ते करणारा नासीरसारखं आम्ही करु शकत नाही.. सरळमार्गी कॉमन मॅन म्हणून मरणं एवढचं आमचं नशीब आहे.. यानंतर या कृत्याचं राजकारण झालं. जबाबदार कोण याचा शोध झाला. केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे राजीनामे झाले. मात्र अजूनही काही ठोस कारवाई करण्याचं आमच्यात आणि आमच्या सरकारमध्येही धाडस नाही. कारण आम्ही सगळेच हळूहळू मुर्दाड झाले आहोत. हा मुद्दा ता असाच तापत राहीलं, एखादं सरकार पडेल, एखादं उभं राहिल पण ज्यांच्या घरातले दिवे, ज्यांच्या कपाळावरचं कुंकु या हल्ल्यानी नेलं त्यांना कुणीच कसल्याच पद्धतीची भरपाई आम्ही देऊ शकणार नाही. उद्या कधीतरी आपलीही वेळ येईल, आणि या हल्ल्यात मेलो नाही म्हणून भाग्यवान असं समजत पुढचे दिवस आम्हाला काढावे लागणार हे नक्की..
काश्मिरमधल्या परिस्थितीबाबत फक्त पेपरात वाचून आणि टीव्हीत बघणारी परिस्थिती आता आम्हालाही व्यापून उरली आहे. आणि आम्ही या सगळ्याला रोखण्यात अगदी असमर्थ आहोत.. याची जाणीव अधिक गडद अधिक गडद होत राहिली आहे. अखेरीस गाडीत शेजा-यावरचा आमचा विश्वास त्याच्या सॅककडे पाहून अधिक डळमळीत व्हायला लागलाय. कदाचित हेच हे सर्व करणा-यांना अपेक्षित आहे..
याचा कुणी बाजार करो, कुणी त्याचं राजकारण करो.. आज एका महिन्यानंतरही हीच खरी स्थिती आहे, आम्ही खचलेलेच आहोत.. फक्त तीव्रता कमी झालीय आणि उद्या काहीही घडलं तरी हे घडणारचं होतं.. अश्या भाकडं प्रतिक्रिया देण्याशिवाय़ आम्ही काही करु शकणार नाही.
दहशतवाद कसा रोखायचा हाच आम्हाला सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. त्यांना काय हवय, हे आम्हाला माहीत नाही, कदाचित त्यांनाही माहीत नाही.. मात्र अश्या माथेफिरुपणाने संपूर्ण समाजाचं अस्तित्व मात्र टांगणीला लागलय. आणि याचं ठोस उत्तर खरचं कुणाकडेच नाही. कदाचित आम्ही हे सर्व थांबवण्यासाठी हेल्पलेस आहोत.