Wednesday, April 30, 2008

वाढदिवसाच्या निमित्तानं..

सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याची मुलाखत आयबीएन लोकमत वाहिनीनं पुन्हा दाखवली..त्यातल्या चर्चेतनं सचिन खरचं किती ग्रेट आहे हे जाणवलं.. त्यानं त्या मुलाखतीत म्हटलय.. ग्राउंडवर मिळणारे जे क्षण असतात, ते पुन्हा पुन्हा आयुष्यात मिळत नाहीत, आणि ते क्षण मापायला कोणतलं माप अपुरं असेल.. कुणालाच संपूर्ण जगासमोर हरण्यासाठी जायला आवडणार नाही, हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याही पेक्षा महत्वाचं ग्राऊंडवर मिळणारे असे काही क्षण आहेत की जे आयुष्यभर साथ करतात. मला वाटतं हे कुठेच कधीच ऐकायला मिळालं नसतं, सचिन केवळ मराठीतून बोलला म्हणूच तो असं काही छान बोलला.. जे आयुष्यभर स्मरणात राहीलं.. आज गेल्या 17-18 वर्षआंपासून सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय.. आज हरभजन सिंग आणि श्रीशांतच्या वादात कुणाच्या डोक्यात किती लवकर हवा जाते, हे दिसतंचं , आणि या सगळ्यात सचिन आपोआप मोठ्ठा वाटायला लागतो.. आजही आपण कुणीही त्याला कितीही क्रिकेटवरुन आणि धावांवरुन शिव्या दिल्या, तरी त्याच्यामागे तो खळावा हीच भावना आपल्या मनात सतत असते, तो मैदानावर येतो तेव्ही अनेकांचे रिमोटवरचे हात आपोआप थांबतात. सगळ्या भारतालाच एकाअर्थी आता सचिन काहीतरी उत्तुंग खेळ दाखवणार असं वाटतं.. आजही वीस वर्षांनतरही प्रत्येक मॅचमध्ये असचं वाटतं राहतं.. आणि सचिन जेव्हा खेळतो तेव्ही त्याचं खेळं पाहत राहणं हा एक सुवर्ण योग असतो.. त्याचा प्रत्येक फटका बघताना, त्यातली त्याची बॅटवरची हुकुमत बघताना, त्याचं पदलालित्य बघताना तो कसा ग्रेट आहे, ते सतत दिसत राहतं.. सगळ्या घराघरात आनंद येतो.. हे सुखद क्षण सतत देण्याचे सचिनचे आमच्यावर खरोखरच अनंत उपकार आहेत.. खेळापलीकडे त्याला पाहताना त्याचं शांत संयमी वागणं , त्याची नम्रता त्याल अधिक मोठं करते.. आणि म्हणूनच त्याच्या क्रिकेटवरच्याच काय पण कुठल्याही प्रतिक्रियेला एक विशेष महत्व असतं.. राज्यातल्या ब-याचं घरात पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा.. याचं उदाहरण देताना सचिनचा उल्लेख आवर्जून होतो.. म्हणूनच क्रेकटचा हा वाघ जेव्हा कमी धावांवर एखाद्या चेंडुवर बाद होतो, तेव्हा सामान्य जनता चिडते, ती ब-याचदा त्याच्यापेक्षा स्वत:वर आणि त्या दिवसाच्या नशिबावर चिडते.. सचिन खेळायला हवा.. असं आत कुठेतरी वाटतं म्हणून आणि त्याचं बाद होणं हे आपलं सगळ्याचं बाद होणं वाटतं म्हणून.. सचिन आउट झाल्यानंतर आता काय उरलयं मॅचमध्ये अश्याही प्रतिक्रिया आपसूक उमटतात. सचिन यंदा पस्तिशीचा झाला.. आमच्या पीढीनं त्याचा खेळ प्रत्यक्ष पाहिला, त्याचं मोठेपणं अनुभवलं.. हे खरचं भाग्याचं.. सचिन आज, उद्या कधीतरी खेळ थांबवेल तेव्हीही चाहत्यांच्या अश्याच रागाच्या प्रतिक्रिया असतील, तो जेव्हा शेवटचा चेंडु खेळून ग्राउंडवरुन निघेल तेव्हा भारतीयांच्या घराघरात माणसं ओक्साबोक्सी रडतील.. खरचं सचिनवर आमचं प्रेम आहे.. कुठेतरी आम्हा सगळ्यांनाच त्यानं एक दिशा दाखवलीय. माणसाला ग्लोबल त्याच्या मेहनतीवर कसं होता येतं.. हे त्यानं दाखवलय. आणि त्याच बरोबर ग्राऊंडवरच्या त्या अमूल्य क्षणांसाठी जगणा-या सचिनसारखी आमच्याही जगण्याच्या ग्राउंडवर कधीतरी आम्ही त्याच्या निमित्तानं काही अमूल्य क्षण अनुभवलेत.. हे त्याने दिलं म्हणून त्याचे आणि त्याला बनविणा-या भगवंत या दोघांचेही आभार..

Sunday, April 27, 2008

टिंग्या

गेल्या महिनाभरात दोन सिनेमे बैलाशी संबंधित आले मराठीत.. त्यातला एक वळू आणि दुसरा टिंग्या दोन्ही सिनेमांची बरोबरी नाही, मात्र दोघांचाही अस्सलपणा जास्त भावणारा आहे. दोन्ही चित्रपटांची मांडणी अतिशय सुंदररित्या केलीय. दोन्हींच्या कथानकातून आणि मांडणीतून मराठी सिनेमानं पुर्णपणे कात टाकलीय. हे पुन्हांदा अधोरेखित झालय.
त्यात बोलूयात टिंग्याविषयी.. अस्सल, मातीतलं, रांगडं असा काहीसा उल्लेख या चित्रपटाविषयी करावाच लागेल. हा सिनेमा जिथे घडतो.. म्हणजे टिंग्यांचं आणि त्याच्या मुस्लिम मैत्रीणीचं घरं ही दोन्ही घरं डोंगरात आहेत.. म्हणजेच साधाराण गावापासून लांब असेल्या पाड्यावर किंवा डोंगरावर .. आत्तापर्यंत कुठलाही मराठी सिनेमा तिथपर्यंत पोहचला नव्हता..हे मला अधिक भावलं..
दुसरं टिंग्याची मैत्रीण असते मुस्लिम घरातील.. मात्र हिंदू आणि मुस्लिम यांचा कोणताही भेद सिनेमात शेवटपर्यंत होतच नाही.. अगदी सहज ग्रामीण भागात हे दोन्ही समाज किती गुण्यागोविंदाने नांदतात, याचं फारचं वास्तववादी चित्रण या सिनेमात आलंय.. आणि त्यात या विषयाचा अजिबात बाऊ केलेला नाही.. त्यात काही भाषणबाजीही नाही, आणि कपोलकल्पित प्रसंगही नाहीत.. त्यामुळेच दिग्दर्शकाचे आभार मानायला हवेत.. गावातल्या समाजमनाचं वास्तववादी चित्रण करण्यात टिंग्यानं चांगलीच बाजी मारलीय.
आता मुख्य कथानकासंबंधात.. टिंग्याचं त्याच्या बैलावर असणारं प्रेम.. बैलाला झालेला अपघात, त्यामुळं त्याचं शेतात राबू न शकणं.. टिंग्याच्या बापासमोर यामुळे निर्माण होणारे प्रश्न.. बैलाला विकण्याच्या घेण्यात येणारा निर्णय... त्याला टिंग्याचा असणारा विरोध.. यात हा सिनेमा उलगडत जातो.. त्यातही विशेष म्हणजे टिंग्याचं एवढं लहान असतानाही घरातलं असणारं स्थान, त्याच्या आईबापाचं त्याच्यावर असेललं आणि त्या बैलावर असलेलं प्रेम कुठेही न सांगता अतिशय व्यवस्थित मांडण्यात आलंय. दोन प्रसंग मला अतिशय आवडले ते ही लिहतो..
1. टिंग्या बैलावर उपचारासाठी डॉक्टर आणायला कुमालाही न संगता ओतूरला जातो.. फक्त त्याच्या मैत्रीणीकडे आलेल्या डॉक्टरांच्या मोटारसायकलवर ओतूरचं नाव बघून.. आणि त्या डॉक्टरकडे पोहचल्यावर तो जनावरांचा डॉक्टर नाही हे कळल्यावर टिंग्या ढसढसा रडतो.. हे कुठेतरी आत खूप अंतर्मुख करतं.. एवढं निरागस प्रेम खरचं कुणी कुणावर करतं का हो..
2. दुसरा प्रसंग बाजारात नेण्यासाठी तालुक्याच्या गावी या बैलाला घेऊन जातात, टिंग्या बापाच्या मागे नेऊ नकोस म्हणून जात असतो. त्याचा बाप त्याला नाही म्हणत असताना मध्येच बरोबर चल म्हणून संगतो.. बैलाला चालता येत नसल्यानं टिंग्याचा मोठा भाऊ त्याला मागून मारत असतो..बैलाला लागतय हे लक्षात आल्यावर टिंग्या भावाला पुढे जायला सांगतो आणि संवत मागे राहतो.. आणि बैलाला लागू नये मात्र आवाज तर यायला हवा म्हणून स्वत:च्या पायावर चाबकाचे फटकारे मारत निघतो.. हे फार अंगावर येतं.. इतक्या आपल्या लाडक्या प्राण्याला बाजारात कापण्यासाठी नेणा-या टिंग्याच्या मनात काय येत असेल..
चित्रपटातला मपला तुपला हे शब्दप्रयोग अती आहेत, असं वाटलं. सर्रासपणे एवढं बोललं जात नाही.. दुसरं टिंग्याच्या मोठ्या भावाला म्हणजे तोही शाळेतच असतो..त्याला या सगळ्याशी काहीही घेणंदेणं नाहीये.. त्याला देण्यात येणारी स्पेसही आणि त्याच्या बेदरकार वागण्यामुळे टिंग्या जास्त उठून येतो.. टिग्याची आई, त्याच्या मैत्रीणीची मरणारी आजी, हे सगळेच अंतर्मुख करत राहतात.. टिंग्याच्या बापाची अवस्था काय होत असेल, हातातलं बियाणं पेरण्यासाठी त्याची चाललेली घालमेल, याच्यासाठी घरातला भाग असलेल्या बैलाला विकावं लागण्याचा घ्यावा लागणारा निर्णय. त्याच्यावर असलेलं कर्ज..त्यात येणारे आत्महत्येचे विचार.. कुठेतरी वास्तवाची ठोस जाणीव करुन देतात... हे थांबवणं इतकं सोप्प नाही, हे लक्षात येतं जातं.. आणि सिनेमा पकड घेत जातो.. लहानग्या टिंग्याच्या बैलावरील अश्राप प्रेमापोटी हा चित्रपट कायम स्मरणात राहतो.. पाडस कादंबरीची आणि मजीद मजिदीच्या चिल्ड्रेन इन हेवनची आठवणही या निमित्तानं याच्याशी लांबून येते.. बैलाला विकण्यासाठी नेणार असल्याच्या आदल्या रात्री टिंग्या त्या बैलाच्या समोर जाऊन बैलाच्या पाठीवर हात ठेउन जे ढसाढसा रडतो.. ते बाहेर येईपर्यंत विसरताच येत नाही.. त्यामुळेच कुठेतरी खोल आत टिंग्या वस्तीला राहतो.. या नव्या दिग्दर्शकाच्या एवढ्या सुंदर कलाकृतीला आपला सलाम..

Saturday, April 26, 2008

विक्रम आणि विराग..

नवी मुंबईतल्या एका मॉलमध्ये विराग वानखेडे या मराठी तरुणानं सलग सहा दिवस, सहा रात्री गाऊन एक नवा विश्व विक्रम प्रस्थापित केला. त्याची फारशी दखल कोणत्याही माध्यमानं घेतली नाही, नाही म्हणायला मराठी न्यूज चॅनेलमध्ये ही बातमी हेडलाईन झाली. मात्र एरवी मुंबईतल्या छोट्या छोट्या गोष्टींचा पराचा कावळा करणारा हिंदी मिडीया मात्र यापासून दूरच राहिला. याची काही कारणंही असावीत, विराग हा काही मुलगी नव्हता. दुसरं त्याचा काही वेगळा पीआर नसावा.. आणि नवी मुंबईला ओबी पाठवण्याइतपत विराग या मिडीयाला महत्वाचा वाटला नसावा, शनिवारसारखा दिवस असूनही त्याला प्रसिद्धी मिळू नये, हे थोडसं खेदकारक वाटलं.. मराठी चॅनेल्सही या विषयावर अर्धा अर्धा तास खेचू शकले असते, पण ते कोणी केलं नाही.. कारण माहिती नाहीत, पण यामुळे विरागचा उत्साह कमी होत नाही, कादाचित तो बोगस गात असावा असंही एका सहका-यानं मला सुचवलं.. मात्र यापेक्षाही सहा दिवस सहा रात्री गाण्याची त्याची निष्ठा मला जास्त महत्वाची वाटते.. विषय फक्त विरागचा नाही, तर कोणीही ज्याची ध्येयनिश्चिती असेल, आणि ते मिळवण्यासाठी त्यानं केलेले प्रयत्न असतील ते आपण नाकारुच शकत नाही.. काहीतरी एखादं ध्येय ठरवावं लागतं, ते कधी कमी पल्ल्याचं किंवा कधी जीवनध्येय असंत आणि ते मिळवण्यासाठी मातीत गाडून घ्यावं लागतं.. त्यात यश मिळतचं असं नाही, मात्र त्यातून कुठेतरी विनोबा, महात्मा, निर्माण होतात. सध्याच्या गुडीगुडीच्या जमान्यात कमी कष्टात गाडून घेण्याची आपली कुवत कमी होत चाललीय. किंवा या सगळ्याला आपण मनी टर्मस मध्ये मोजायला लागलो आहोत.. परवा मी एकाच कुटुंबातील दोघांना भेटलो.. एक काका आणि त्यांची पुतणी.. डोंबिवलीतील मध्यमवर्गीय कुटुंबापैकीच एक.. त्यातील काकांनी सज्जनगडावर समर्थांच्या सेवेसाठी जीवन समर्पित कलंय. तर त्यांच्या पुतणीनं रसायनशास्त्रात पीएचडी करुन पुढील अभ्यास अमेरिकेत केला. आणि आता ती टेक्सासमध्येच राहते. आपल्या ध्येयांसाठी लग्न न करण्याचा निर्णय या दोघांनीही घेतलाय. या दोघांची कुणी दखल घ्यावी, असं त्यांनाही वाटतं नाही, आणि या निमित्तानं हे सांगण्याचा प्रयत्नही नाही, मात्र एखादं ध्येय ठरवून त्यात गाडून घेउन जे यश मिळतं, त्याचा आनंद काहीतरी निराळाच असतो.. आज माझ्याकडेही तो नाही, म्हणून हे जास्त जाणवतं.. जे ध्येय ठरवण्याचा निर्णय मनापासून सगळी बंधन झुगारुन घेऊ शकतात, त्यांच्याबद्दल जास्त आदर वाटतो.. स्वातंत्र्यपूर्व काळात अशी ध्येय आजूबाजूला होती आणि त्या ताकदीची माणसंही होती, सध्या सगळ्याच क्षेत्राचा बाजार झाल्यामुळं किंवा यशाचे निकष बदलल्यामुळे म्हणा संस्थात्मक कार्य करणा-यांची संख्या कमी होत चाललीय. म्हणूनच आजही कुठल्याही एखाद्या क्षेत्रात स्वत:ला बाप म्हणून सिद्ध करणा-यांचा आदर वाटतो.. आणि जे हा निर्णय परिस्थितीच्या रेट्यानं घेतात, मात्र त्यांची ताकद असेल तर तिथेही ते स्वत:ला सिद्ध करु शकतातच.. फक्त खंत वाटते ती सगळं झुगारुन देऊन काहीतरी करण्याची ओढ आजूबाजूला कुणातच जाणवत नाही, स्वत:चाही याबाबतीत कोंडमारा होतो. त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, पैसा आणि उपल्ब्ध वेळ, जबाबदा-या याचा मेळ जमत नाही.. पण म्हणूनच एखाद्या ठिकाणी गाडून घेऊन काम करणा-या प्रत्येकाला सलाम कारावासा वाटतो.. म्हणूनच गेली चार वर्षे विक्रमासाठी मेहनत करणारा विराग या साखळीतलाच एक भाग आहे, असं मला वाटतं..

एक अनुभव..

रात्रपाळीसाठी घरातनं निघालो.. घरी कुणीही नव्हतो.. जेवायला एका हॉटेलात गेलो..
स्वाभाविक रात्री 9ची वेळ असल्यानं हॉटेलात गर्दी होती.. कुठे बसायचं.. हे ठरवत असताना
एका टेबलावर एक अंधळा मुलगा जेवताना दिसला..
त्याचे कपडे फाटके होते.. थोडेसे मळलेलेही होते..
एवढ्या चांगल्या हॉटेलात तो एकटाच न शोभणारा असा दिसत होता..
त्याच्या शेजारच्याच टेबलावर जेवायला बसलो.. माझ्या आजूबाजूच्या चार टेबलांवरील
माणसांचं लक्ष त्या अंधळ्या माणसाकडं होतं. त्याच्या पुढ्यात भात होता,
त्यात ओतलेलं वरण त्याला दिसत नव्हतं. त्याला पाणी देणारा पो-या त्याला
तो भात कालव असा आग्रह करीत होता. पण त्या बिचा-याला त्याची कल्पनाही नव्हती..
माझ्या समोरच्या टेबलावर बसलेला एक माणूस जेवताना त्या अंधळ्याकडं बघत होता.
वेटरला बोलवून आपल्या ताटातलं दही आणि स्वीट त्यानं त्या अंधळ्याला द्यायला लावलं.
माझंही जेवण आटोपत आलं होतं. तेवढ्यात त्या अंधळ्या माणसांचही जेवण संपलं. तो उठला..
काउंटरला गेला , तर आलेलं बील भरायला त्याच्या खिशात पैसेच नव्हते. त्यानं त्याचे सगळे खिसे तपासले. मात्र त्याच्या खिशात पैसेच नव्हते.. हॉटेलमालकानं एका शब्दानंही न हटकता त्याला जाउ दिलं. मी बील द्यालया काउंटरवर गेल्यावर शंभराची नोट दिली.. आणि त्या अंधळ्या मुलाचे पैसेही माझ्या बीलाबरोबर घ्या असा आग्रह केला. मात्र हॉटेलमालकानं मला नकार दिला. असे रोजच येतात हेही त्यानं मला सांगीतलं.. त्याच्यासोबत आलेल्या माणसानं त्या अंधळ्याला हॉटेलात सोडताना त्याच्या खिशातील 20 रुपयांची नोट पळवल्याचंही त्यानं सांगीतलं. तो पैसे पळविणारा एका बाजूला, तर त्याला भात कालवण्याचा आग्रह धरणारा पो-या, दही देणारा ग्राहक, बील न घेणारा हॉटेलमालक आणि त्याचं बील भरणारा मी, असे दुस-या बाजूला होतो. आम्ही कुणीच कुणाला ओळखत नव्हतो.. यापुढे भेटण्याची शक्यताही नव्हती.. पण हॉटेलमालकाच्या या सांगण्याने माझे डोळे भरुन आले.. जगात चांगुलपणा नाही अशी ओरड सगळीकडे होत असताना
कोणीही बडेजाव न मिरवता सहज त्या अंधळ्याला पोटभर मिळावं
यासाठी प्रयत्न करीत होतो.. यात दयाही नव्हती.. एक माणूस म्हणून दुस-या माणसाबद्दल वाटणारा जिव्हाळा होता..
एरवी त्या हॉटेलमालकाच्या गब्बरपणामुळे
त्याच्याबद्दल वाटणारा एक आतला संताप क्षणात नष्ट झाला. त्याला आशिर्वाद द्यावेसे वाटले
ते दिलेही.. पण मनातल्या मनात.. मी काहीही केलं नव्हतं.. मी पैसेही दिले नव्हते..पण आत कुठेतरी खूप समाधानानं मी स्टेशनवर गाडी पकडायला आलो.. आत कुठेतरी आपण सुरक्षित आहोत.. इथे चांगुलपणा आहे.. असं उगाचच आत कुठेतरी वाटलं.. आणि तो दिवस आनंदात गेला..

सुरुवातीला थोडसं...

मी काही लेखक नाही, किंवा अभ्यासूही नाही.. मी एक सामान्य माणूस आहे..
पण माझ्या जगण्यात मी जे काही बघतो, पाहतो,
मला जे सुचतं.. मला जे भावतं.. जे कुठेतरी आत अंतर्मुख करतं..
किंवा ज्यापुढे मला वाकावसं वाटतं.. अश्या काही आदर्शांची काही प्रसंगाची
काही सर्जनाची कुठेतरी नोंद व्हावी, असं फार आतून वाटतं..
ते कुठेतरी उतरवायला हवं.. असंही फार आतून वाटतं..
आताशा ही गरज जास्त वाटते.. यातनं काही अनुभव शेअर करता येतात का,
काही अधिक चांगलं पदरात पडेल का.. या सगळ्याचा हा शोध आहे..
कदाचित स्वत:चाही.. सगळ्यांसमोरचा..
बघुयात काय पदरात पडतयं ते..