Thursday, November 20, 2008

आनंदक्षण..

दिलीप कुलकर्णीचं निसर्गायण नावाचं पुस्तक आहे.. खूपच छान आहे.. त्यात त्यांनी भगवंताच्या भेटीसाठी लागणारी आत्मियता म्हणजे काय किंवा तादात्म्य पावणं म्हणजे काय.. किंवा सुख म्हणजे काय याची एक सुंदर व्याख्या केलीय..
ऐन पावसाळ्यात एखाद्या डोंगरावर उभं राहिल्यानंतर समोरचं हिरवंगार रान बघताना काही क्षण आपण स्वत:ला आजूबाजूच्या परिसराला, आपल्या नोकरीला, आई-वडिलांना , संपूर्ण जगाला विसरुन जातो.. काही क्षणाचीच ती एक विलक्षण सुंदर समाधी असते.. आणि ते जे क्षण असतात ते ख-या अर्थी आनंदक्षण... आणि असे क्षण एकत्र राहणे म्हणजे भगवंताशी तादात्म्यता पावणे होय.. संतांच्या भगवंताच्या भेटीच्या क्षणात हे क्षण त्यांच्याकडे सातत्यानं येतात . हे खरं .. तर आत्ताच हा विषय काढण्याची किंवा आठवण्याची गरज काय.. तर परवा एक सुंदर कविता ऐकली..त्यात आनंदक्षण असा उल्लेख आला.. आणि त्या आनंदक्षणावरुन हे सगळं आठवलं.. आता नेहमीच्या धावपळीत असे क्षण वाट्याला फारसे येत नाहीत, हेही खरचं.
जेव्हा शाळेत होतो, तेव्हा असे क्षण वाट्याला पुरेपुर आले आहेत आणि त्याचा आनंद खरोखरच पूर्णपणे उपभोगता आला आहे.. माझं लहानपण पुणे जिल्हात घोडेगाव या गावी गेलं. तिथं फार सुंदर थंडी पडायची.. शनिवारी सकाळी सातची शाळा असायची आणि वर्गात स्वेटर घालून येणा-याला मुलगी म्हणून चिडवलं जायचं.. त्यामुळे कितीही थंडी असली तरी झक्कत वर्गातली सगळी मुलं सकाळी नेहमीच्या शाळेच्या ड्रेसवरच शाळेत यायची.. सकाळी साडे सातला धुक्यातून शाळेत पोहचल्यावर एखादी शेकोटी पेटवून त्याच्या काठावार बसलं.. आणि मित्रमंडळीत कुणाची तरी टवाळी निघाली की असेच काही आनंद क्षण मी उपभोगले आहेत.. आणि आज त्या सगळ्याची आठवण झाली झाली तरी काही क्षण निवांतपणा वाटतो.. दुसरा एक अनुभव सांगतो.. हरिश्चंदंर् गडावर जुलैच्या मध्यात ट्रेकला गेलो होतो आम्ही तिघे बंधू.. त्यातला आज एकजण अमेरिकेत आहे.. वाटेवर एका ठिकाणी कडा चढून गेल्यानंतर सगळे ढग त्या कड्यावर उतरले होते.. कितीतरी वेळ म्हणजे जवळपास वीस मिनीटे आम्ही एकमेकांशी काहीही न बोलता तो आनंद फक्त उपभोगत होते.. खरा आनंदक्षण ..
असे कितीतरी अनुभव आहेत की ज्या क्षणांनी भरभरुन दिलं.. आणि मी भरभरुन उपभोगलं.. काही खाण्यातले आहेत..कही मित्रमंडळीतले आहेत.. काही वाचनातले आहेत काही अजून काही आठवणींचे आहेत.. त्या सर्व क्षणांनी मी अधिकाधिक समृद्ध झालो.. असे क्षण खरे आनंदक्षण ..

Friday, November 14, 2008

तर वेळ हातातून निघून गेलेली असेल...

राज ठाकरेंचं उत्तर भारतीयांविरोधातलं आंदोलन.. विक्रोळीच्या जाहीर सभेत लालूप्रसादापांसून, अमिताभ बच्चनांवर टीका करणा-या राज ठाकरेंच्या आंदोलनाचं स्वरुप आता केकच्या वादापर्यंत येऊन पोहचलं.. या प्रवासात राज्यातल्या म्हणा किंवा मुंबईकरांच्या पदरात खरोखरच काय पडलं.. याचा विचार केला तर थोडीशी अनिश्चितता, राजच्या अटकेमुळे दोन दिवसांची जबरदस्ती सुट्टी आणि सध्याच्या धकाधकीच्या जगण्यातला एक वाढलेला ताप.. याशिवाय दुसरी उत्तर मिळू शकतील असं मला वाटतं नाही..
फारतर काही स्थानिक टग्यांना यानिमित्तानं दादागिरी करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळाला.. आणि हिंदू मुस्लिम, सवर्ण-दलित या संघर्षात राज मराठी विरुद्ध उत्तर भारतीय अश्या नव्या संघर्षाची नांदी मात्र सुरु झाली. राजकारण समोर असल्यानं राज्यातल्या मनसे शिवसेनेनं आणि उत्तर भारतातल्या नेत्यांनी या मुद्द्याचा तापत्या तव्यासारखा वापर करुन घेतला. नाहीतरी विकासापेक्षा भावनिक मुद्द्यावर शक्यतोवर मतदारांना फसवता येईल तितकं फसवण्यासाठी हा मुद्दा अस्मितेशी जोडणार हे नक्की झालय. त्यामुळे येत्या निवडणुकांतही या मुद्द्यावर सतत काही ना काही होत राहील, महाराष्ट्रात राज ठाकरे हिरो राहतील, तर उत्तर भारतात राहुल राज शहीद ठरेल.. आणि यातनं राज्यातल्या उत्तर भारतीयांच्या मनात आणि बाहेरच्या राज्यातल्या मराठी माणसांच्या कुटुंबांच्या मनात एक सतत भीतीची जाणीव मात्र कायम राहील. वाहिन्यांवर सतत याचाच उदो उदो करत हिंदी वाहिन्या राज ठाकरेंच्या विरोधात तर मराठी वाहिन्या राज यांच्या बाजूनं उभं राहतील. यात त्यांचे त्यांचे टीआरपी त्यांना सोडवायचे आहेत, वाढवायचे आहेत.. नंबर वन व्हायचं आहे. प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी आणि सध्याच्या दिशाहिन भरकटलेल्या माध्यमांना हा चांगला मुद्दा दिवसभर पाणी टाकून पिटण्यासाठी मिळाला आहे.. आहे की नाही या सगळ्यांचं कौतुक..
आपल्याच देशात असुरक्षिततेची जाणीव होणं हे किती वाईट आहे.. याचा प्रत्यय या सगळ्यांपैकी कुणालाच नाही.. यातून आपण काय पेरतो आहोत.. या नकारात्मक प्रसिद्धीचा आणि आंदोलनांचा काय परिणाम होईल याची जाणीव नाही किंवा ती आहे मात्र आपल्या स्वार्थापुरता त्याचा विचार करण्याएवढेच मर्यादित राहिलोत..
मनातून काही मंडळी राज यांच्या भूमिकेशी संमत असतीलही , उत्तर भारतीयांवर धाक राहण्यासाठी अश्या भाषणबाजीची गरज आहेही मात्र प्रत्यक्षात रस्त्यावंर येऊन त्याची परिणती जर खून पडण्यात आली, किंवा बाहेरच्या राज्यातल्या एखाद्या मराठी कुटुंबियांना काही इजा पोहचवण्यात झाली, तर सरसकट सगळ्यांनाच आणि त्यातही माध्यमांनाही आपली मान शरमेनं खाली घालायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.
आज केवळ व्यासपीठांवरुन एकमेकांवर होणारे आरोप प्रत्यारोपांचं राजकारण हिंसेत उतरवण्यासाठी निवडणुका जशजश्या जवळ येतील तसतसा जास्त प्रयत्न होईल.. एका वेगळ्याचं कारणावरुन दंगलसृदृश
स्थिती निर्माण होईल, आणि हा करतो मग मी का मागे, यासाठी अन्य काही पक्ष, व्यक्ती, गट यात सहभागी होतील. मात्र याचा परिणाम मात्र सर्वसामान्य माणसांवर होईल.. आधीच सकाळी संध्याकाळी घरी परतायला मिळेल की नाही, या धास्तीनं गाडीला निघणा-या मुंबईकरांच्या जगण्यातली अनिश्चितता मात्र कायमच वाढत राहील.
आत्तापर्यंत काश्मिरात होणारे बॉम्बस्फोट आमच्या आजूबाजूला व्हायला लागलेत, हे आम्ही सहन केलं..
आता समाजात एका वेगळ्या दरीला जन्म देऊन, उत्तर भारतीयांना विरोध करुन भारताचं खंडण करण्याचे हे विचार आहेत, त्यालाही आम्ही कदाचित सहन करु.. मात्र प्रत्यक्षात आपल्याभोवती हेही गंभीर पडसादाच्या स्वरुपात येईल.. तेव्हा त्याला उत्तर देण्यास किंवा सामोरं जाण्यास आम्ही तयार नसू.. कदाचित इतकं होईल असं वाटलं नव्हतं.. अश्या स्वरुपाच्या आपल्या प्रतिक्रिया असतील, मात्र त्यावेळी कदाचित वेळ सगळ्यांच्याच हातातून निघून गेलेली असेल.

Sunday, November 2, 2008

दिवाळी काय देते...

दिवाळी आली आणि गेली.. दिवाळीच्या निमित्तानं आमच्या जगण्यात उगाचच काही दिवे आले , काही लागले.. पण हा आनंद एकत्रित साजरा करु शकलो का.. हा महत्वाचा प्रश्न आहे..
दिवाळी काय असते आपल्या सगळ्यांसाठी, तर या निमित्तानं आपण एकत्र येतो, नाहीतर आपल्या राहटगाड्यात आपल्याला तरी कुठे एकत्र येण्याचे निवांत क्षण मिळतात, नाही का.. कधीतरी एखाद्याचा वीक एंड खूप चांगला साजरा होता खरा.. पण तो त्या एकट्याशी संबंधित राहतो. मात्र दिवाळीचा उत्साह सगळ्यांना असोत. या निमित्तानं घराघरात गोडधोड होतं. नव्या वस्तू येतात. गेल्या वर्षी ठरवलेल्या काही उद्दिष्टांची पूर्ती होते. प्रत्येकाची ध्येय वेगवेगळी असतात खरी, पण ती पूर्ण करण्यासाठी दिवाळीचे टार्गेटस असतात, ते महत्वाचं.. प्रत्येकाच्या ध्येयपूर्तीच्या मर्यादा या वेगवेगळ्या असू शकतात. उदा. काही जणांसाठी टीव्ही असेल, तर एखाद्यासाठी कार, तर एखाद्यासाठी कपडेही..
दिवाळी निमित्तानं आपण अनेकांना शुभेच्छा देतो. एसएमएससारख्या माध्यमातून त्यातले 80 टक्के खोटे, नाटकी असतील किंवा अपरिहार्यतेतून आलेले असतीलही, पण किमान 20 टक्के आपल्या अवतीभोवती असणा-या चांगल्या माणसांनी आठवण आपल्याला या निमित्ताने होते.. त्यांच्याशी गप्पा होतात. सर्वात महत्वाचं दोन दिवस माणसं निवांत असतात... नवरा बायकोला वेळ देतो, बहिण भावाला वेळ देते.. किती महत्वाचं आहे की नाही.. हे सगळं.. नाहीतर धावताना आपण आता सगळचं विसरायला लागलो आहेत.. यात हे काही विरुंगळ्याचे क्षण वर्षभर पुन्हा धवण्याची आणि नव्या ध्येय निश्चितीची एक उमेद देतात. माणसांमाणसांमध्ये संबंध विरळ होत असताना, दिवाळीसारखे सण खरचं काही तरी दिवे घएऊन येतात. मला वाटतं नेहमीच्या जगण्याच्या धावपळीत हे असं काहीतरी असायला हवं बरं नाहीतर आपण कामापाठी वेडे होऊन जाऊ... म्हणूनच जागतिक मंदीच्या वाटेवरही खरेदी कमी झाली असली तरी दिवाळीची उत्साह मात्र आपल्या सगळ्यांच्या मनात तेवढाच राहीला हे महत्वाचं.. थोडे फटाके कमी वाजले असतील, थोडे ग्राहक कमी झाले असले तरी दिवाळी दिवाळीच राहीली..