Sunday, March 13, 2011

रविवारची फिस्ट...











शनिवारची उशिराने झालेली रात्र... रविवारची पहाटे 10 पर्यंतची साखरझोप.. चहाच्या पेल्याबरोबच मित्रांचे आलेले फोन... आणि मग विनाअंघोळीची बाईकवरुन किंवा कारमधून लांबवर कुठेतरी मारलेली रपेट.. मग सगळ्या चर्चा , गंमत संपल्यानंतर पोटात झालेली भूकेची जाणीव... आणि मग कुठेतरी फक्कड ठिकाणी
नाश्ता म्हणताना सगळयांनीच आटोपलेलं जेवण... रविवारच्या सुखाची कल्पना ही माझ्यासाठी अशी आहे.
रोजच्या धकाधकीत दोन-तीन तास लोकलने झालेला प्रवास आणि मुंबईचं तेचतेच दर्शन, यामुळं मरगळलेल्या मनाला पुन्हा जिवंत करणारी ही भटकंती आणि नवे विचार यासारखी गंमत नाही.. शनिवारी रविवारी या दोन दिवसाच्या सुट्टीत लोकलने मुंबईच्या दिशेने प्रवास करायचा नाही, असा आमच्या काही मित्र मंडळींचा पण आहे.. तसचं आठवड्यात कामाच्या वेळी कुठेही म्हणजे मुंबईत, ठाण्यात, नवी मुंबईत, पुण्यात, नाशकात अशा आसपासच्या ठिकाणी असलेली ही मंडळी शनिवारी आणि रविवारी मात्र न चुकता बदलापूरकडं धावत असतात.. एरवी सकाळई दहाच्या सुमारास लोकलनं रिकामं केलेलं बदलापूर शनिवारी आणि रविवारी मात्र फुलून आलेलं असतं. प्रत्येकाच्या ठरलेल्या नाक्यावर कोणत्याही घरच्या कपड्यांत तासनतास एकमेकांशी सिगरेटी, चहांची देवाणघेवाण करत गप्पा मारत बसलेली तुम्हाला नक्की दिसतील.. बर एरवी यातली बरीशची मंडळी त्यांच्या त्यांच्या कामाच्या ठिकाणी चांगल्या पोस्टवर असलेली..तरीही त्यांची कोणतीही भीडभाड न ठेवता शनिवारी आणि रविवारी मात्र हे बदलापूर सुख लुटायला सगळेच येतात.. यामागं असतं बदलापूरचं प्रेम.. एरवी कोणीही बदलापूर लांब म्हणून त्याला टाकून बोललेलं या मंडळींना आवडत नाही, कारण त्यांना बदलापूरची मजा ठाऊक असते..
शहरी आणि ग्रामीण अशी दोन्ही रुपं धारण केलेलं बदलापूर म्हणूनच मग सगळ्यांचं वीक एन्ड डेस्टिनेशन असंत.. कुठेतरी तळ्यावर, मुळगावच्या खंडोबाच्या मंदिरात, बारवी डॅम परिसरात, तिथून पुढे टिटवाळा ते थेट माळशेजपर्यंत, तर कुठे कोंडेश्वर, कुठल्यातरी रेनी रिस़ॉर्टवर, वांगणी, नेरळ, कर्जत ते पार खंडाळा लोनावळ्यापर्यंत बदलापूरकरांना फिरायला फार आवडतं.. आणि मग त्यातही कोणी ऑफिसची मित्र मंडळी आली तर धम्मालच.. बदलापूरकरांमध्ये असचं एक आवडतं ठिकाण म्हणजे मुळगाव.. बदलापूरपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावानं अजून आपलं गावपण टिकवून ठेवलय.. तशी आजूबाजूची गावही आहेतच, मात्र इथला खंडोबा आणि मामांचं हॉटेल हे बदलापूरसाठी मुख्य आकर्षण..
बारवी डॅमकडे फिरायला गेलेल्या सगळ्याच मंडळीचे पाय या टपरीवजा ह़ॉटेलकडे नक्की वळतात.. मोठमोठ्या चारचाकी गाड्या इथं थांबतात.. आणि मग सुरु होते खाद्ययात्रा.. गरमागरम गरम वडे आणि त्यासोबत असणारा ठेचा हे या ठिकाणचं खास वैशिष्ठ्य.. त्याचबरोबर मग जबरदस्त तर्री असलेली मिसळ वगैरै सोबतीला आलचं.. मुख्य अट एकच तिखटं खाण्या-यांनीच या ठिकाणी यावं..
उकडलेल्या बटाट्यात हळद, कोथिंबीर, थोडासा ठेचा याचं तयार केलेलं मिश्रण, डाळीच्या पिठातून काढून तेलाच्या कढईत टाकलेले वडे आणि गि-हाईकांची वर्दळ आणि मामांकडून गि-हाईकांचं होणारं स्वागत.. यामुळं एक मजाच याठिकाणी असते.. बरीच मंडळी या ठिकाणी वड्यांवर आणि रश्यावर ताव मारत बसलेले असतात.. पूर्वी लहान असलेल्या या हॉटेलचा आता बराच विस्तार झआला आहे. पूर्वी ठेचा आणि वड्यापुरतीच मर्यादा होती, आता त्यात चिकन आणि मटन थाळीही आली आहे.. पण एवढं होऊनही मुख्य वड्याकडे दुर्लक्ष झालेलं नाही आणि फारसा झगमगाटही आलेला नाही. त्यामुळे या वाटेवर आलं की इथं मंडळी हटकून थांबतातच..
मग मित्रांच्या गप्पा, मस्करीत पावांचा आणि वड्यांचा हिशेब ठेवणं अवघड जातं, बिसलेरीच्या थंड पाण्याच्या बाटल्या येतात.. उसळीच्या वाट्यान वाट्या येतच राहतात, तिखटं न खाण्या-याची खेचली जाते.. थोडसं हा हू करत का होईना, रुमाल काढत तोंड पुसतं मंडळी अक्षरश तुटून पडतात.. मग हा नाश्ता आहे हे भानही संपतं आणि मग या वड्यावर, ठेच्यावरच जेवण होऊन जातं.. हे कुणाच्या लक्षातही येत नाही.. इथला ठेचा तर टेस्ट करुन बघावा असाच.. ते त्याला चटणी म्हणतात पण आहे प्रत्यक्षात ठेचाच.. तेलानं माखलेल्या प्लेटमध्ये हिरव्या मिरच्यांचा हा ठेचाच या जेवणाला अधिक रंगत आणतो..
चला तर मग कधी येताय बदलापूरला या फिस्टचा अनोखा आनंद लुटण्यासाठी..