Saturday, April 26, 2008

विक्रम आणि विराग..

नवी मुंबईतल्या एका मॉलमध्ये विराग वानखेडे या मराठी तरुणानं सलग सहा दिवस, सहा रात्री गाऊन एक नवा विश्व विक्रम प्रस्थापित केला. त्याची फारशी दखल कोणत्याही माध्यमानं घेतली नाही, नाही म्हणायला मराठी न्यूज चॅनेलमध्ये ही बातमी हेडलाईन झाली. मात्र एरवी मुंबईतल्या छोट्या छोट्या गोष्टींचा पराचा कावळा करणारा हिंदी मिडीया मात्र यापासून दूरच राहिला. याची काही कारणंही असावीत, विराग हा काही मुलगी नव्हता. दुसरं त्याचा काही वेगळा पीआर नसावा.. आणि नवी मुंबईला ओबी पाठवण्याइतपत विराग या मिडीयाला महत्वाचा वाटला नसावा, शनिवारसारखा दिवस असूनही त्याला प्रसिद्धी मिळू नये, हे थोडसं खेदकारक वाटलं.. मराठी चॅनेल्सही या विषयावर अर्धा अर्धा तास खेचू शकले असते, पण ते कोणी केलं नाही.. कारण माहिती नाहीत, पण यामुळे विरागचा उत्साह कमी होत नाही, कादाचित तो बोगस गात असावा असंही एका सहका-यानं मला सुचवलं.. मात्र यापेक्षाही सहा दिवस सहा रात्री गाण्याची त्याची निष्ठा मला जास्त महत्वाची वाटते.. विषय फक्त विरागचा नाही, तर कोणीही ज्याची ध्येयनिश्चिती असेल, आणि ते मिळवण्यासाठी त्यानं केलेले प्रयत्न असतील ते आपण नाकारुच शकत नाही.. काहीतरी एखादं ध्येय ठरवावं लागतं, ते कधी कमी पल्ल्याचं किंवा कधी जीवनध्येय असंत आणि ते मिळवण्यासाठी मातीत गाडून घ्यावं लागतं.. त्यात यश मिळतचं असं नाही, मात्र त्यातून कुठेतरी विनोबा, महात्मा, निर्माण होतात. सध्याच्या गुडीगुडीच्या जमान्यात कमी कष्टात गाडून घेण्याची आपली कुवत कमी होत चाललीय. किंवा या सगळ्याला आपण मनी टर्मस मध्ये मोजायला लागलो आहोत.. परवा मी एकाच कुटुंबातील दोघांना भेटलो.. एक काका आणि त्यांची पुतणी.. डोंबिवलीतील मध्यमवर्गीय कुटुंबापैकीच एक.. त्यातील काकांनी सज्जनगडावर समर्थांच्या सेवेसाठी जीवन समर्पित कलंय. तर त्यांच्या पुतणीनं रसायनशास्त्रात पीएचडी करुन पुढील अभ्यास अमेरिकेत केला. आणि आता ती टेक्सासमध्येच राहते. आपल्या ध्येयांसाठी लग्न न करण्याचा निर्णय या दोघांनीही घेतलाय. या दोघांची कुणी दखल घ्यावी, असं त्यांनाही वाटतं नाही, आणि या निमित्तानं हे सांगण्याचा प्रयत्नही नाही, मात्र एखादं ध्येय ठरवून त्यात गाडून घेउन जे यश मिळतं, त्याचा आनंद काहीतरी निराळाच असतो.. आज माझ्याकडेही तो नाही, म्हणून हे जास्त जाणवतं.. जे ध्येय ठरवण्याचा निर्णय मनापासून सगळी बंधन झुगारुन घेऊ शकतात, त्यांच्याबद्दल जास्त आदर वाटतो.. स्वातंत्र्यपूर्व काळात अशी ध्येय आजूबाजूला होती आणि त्या ताकदीची माणसंही होती, सध्या सगळ्याच क्षेत्राचा बाजार झाल्यामुळं किंवा यशाचे निकष बदलल्यामुळे म्हणा संस्थात्मक कार्य करणा-यांची संख्या कमी होत चाललीय. म्हणूनच आजही कुठल्याही एखाद्या क्षेत्रात स्वत:ला बाप म्हणून सिद्ध करणा-यांचा आदर वाटतो.. आणि जे हा निर्णय परिस्थितीच्या रेट्यानं घेतात, मात्र त्यांची ताकद असेल तर तिथेही ते स्वत:ला सिद्ध करु शकतातच.. फक्त खंत वाटते ती सगळं झुगारुन देऊन काहीतरी करण्याची ओढ आजूबाजूला कुणातच जाणवत नाही, स्वत:चाही याबाबतीत कोंडमारा होतो. त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, पैसा आणि उपल्ब्ध वेळ, जबाबदा-या याचा मेळ जमत नाही.. पण म्हणूनच एखाद्या ठिकाणी गाडून घेऊन काम करणा-या प्रत्येकाला सलाम कारावासा वाटतो.. म्हणूनच गेली चार वर्षे विक्रमासाठी मेहनत करणारा विराग या साखळीतलाच एक भाग आहे, असं मला वाटतं..

No comments: