Friday, November 14, 2008

तर वेळ हातातून निघून गेलेली असेल...

राज ठाकरेंचं उत्तर भारतीयांविरोधातलं आंदोलन.. विक्रोळीच्या जाहीर सभेत लालूप्रसादापांसून, अमिताभ बच्चनांवर टीका करणा-या राज ठाकरेंच्या आंदोलनाचं स्वरुप आता केकच्या वादापर्यंत येऊन पोहचलं.. या प्रवासात राज्यातल्या म्हणा किंवा मुंबईकरांच्या पदरात खरोखरच काय पडलं.. याचा विचार केला तर थोडीशी अनिश्चितता, राजच्या अटकेमुळे दोन दिवसांची जबरदस्ती सुट्टी आणि सध्याच्या धकाधकीच्या जगण्यातला एक वाढलेला ताप.. याशिवाय दुसरी उत्तर मिळू शकतील असं मला वाटतं नाही..
फारतर काही स्थानिक टग्यांना यानिमित्तानं दादागिरी करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळाला.. आणि हिंदू मुस्लिम, सवर्ण-दलित या संघर्षात राज मराठी विरुद्ध उत्तर भारतीय अश्या नव्या संघर्षाची नांदी मात्र सुरु झाली. राजकारण समोर असल्यानं राज्यातल्या मनसे शिवसेनेनं आणि उत्तर भारतातल्या नेत्यांनी या मुद्द्याचा तापत्या तव्यासारखा वापर करुन घेतला. नाहीतरी विकासापेक्षा भावनिक मुद्द्यावर शक्यतोवर मतदारांना फसवता येईल तितकं फसवण्यासाठी हा मुद्दा अस्मितेशी जोडणार हे नक्की झालय. त्यामुळे येत्या निवडणुकांतही या मुद्द्यावर सतत काही ना काही होत राहील, महाराष्ट्रात राज ठाकरे हिरो राहतील, तर उत्तर भारतात राहुल राज शहीद ठरेल.. आणि यातनं राज्यातल्या उत्तर भारतीयांच्या मनात आणि बाहेरच्या राज्यातल्या मराठी माणसांच्या कुटुंबांच्या मनात एक सतत भीतीची जाणीव मात्र कायम राहील. वाहिन्यांवर सतत याचाच उदो उदो करत हिंदी वाहिन्या राज ठाकरेंच्या विरोधात तर मराठी वाहिन्या राज यांच्या बाजूनं उभं राहतील. यात त्यांचे त्यांचे टीआरपी त्यांना सोडवायचे आहेत, वाढवायचे आहेत.. नंबर वन व्हायचं आहे. प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी आणि सध्याच्या दिशाहिन भरकटलेल्या माध्यमांना हा चांगला मुद्दा दिवसभर पाणी टाकून पिटण्यासाठी मिळाला आहे.. आहे की नाही या सगळ्यांचं कौतुक..
आपल्याच देशात असुरक्षिततेची जाणीव होणं हे किती वाईट आहे.. याचा प्रत्यय या सगळ्यांपैकी कुणालाच नाही.. यातून आपण काय पेरतो आहोत.. या नकारात्मक प्रसिद्धीचा आणि आंदोलनांचा काय परिणाम होईल याची जाणीव नाही किंवा ती आहे मात्र आपल्या स्वार्थापुरता त्याचा विचार करण्याएवढेच मर्यादित राहिलोत..
मनातून काही मंडळी राज यांच्या भूमिकेशी संमत असतीलही , उत्तर भारतीयांवर धाक राहण्यासाठी अश्या भाषणबाजीची गरज आहेही मात्र प्रत्यक्षात रस्त्यावंर येऊन त्याची परिणती जर खून पडण्यात आली, किंवा बाहेरच्या राज्यातल्या एखाद्या मराठी कुटुंबियांना काही इजा पोहचवण्यात झाली, तर सरसकट सगळ्यांनाच आणि त्यातही माध्यमांनाही आपली मान शरमेनं खाली घालायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.
आज केवळ व्यासपीठांवरुन एकमेकांवर होणारे आरोप प्रत्यारोपांचं राजकारण हिंसेत उतरवण्यासाठी निवडणुका जशजश्या जवळ येतील तसतसा जास्त प्रयत्न होईल.. एका वेगळ्याचं कारणावरुन दंगलसृदृश
स्थिती निर्माण होईल, आणि हा करतो मग मी का मागे, यासाठी अन्य काही पक्ष, व्यक्ती, गट यात सहभागी होतील. मात्र याचा परिणाम मात्र सर्वसामान्य माणसांवर होईल.. आधीच सकाळी संध्याकाळी घरी परतायला मिळेल की नाही, या धास्तीनं गाडीला निघणा-या मुंबईकरांच्या जगण्यातली अनिश्चितता मात्र कायमच वाढत राहील.
आत्तापर्यंत काश्मिरात होणारे बॉम्बस्फोट आमच्या आजूबाजूला व्हायला लागलेत, हे आम्ही सहन केलं..
आता समाजात एका वेगळ्या दरीला जन्म देऊन, उत्तर भारतीयांना विरोध करुन भारताचं खंडण करण्याचे हे विचार आहेत, त्यालाही आम्ही कदाचित सहन करु.. मात्र प्रत्यक्षात आपल्याभोवती हेही गंभीर पडसादाच्या स्वरुपात येईल.. तेव्हा त्याला उत्तर देण्यास किंवा सामोरं जाण्यास आम्ही तयार नसू.. कदाचित इतकं होईल असं वाटलं नव्हतं.. अश्या स्वरुपाच्या आपल्या प्रतिक्रिया असतील, मात्र त्यावेळी कदाचित वेळ सगळ्यांच्याच हातातून निघून गेलेली असेल.

1 comment:

Vinod Patil said...

लेखातून संवेदनशीलता निश्चितच जाणवते. प्रादेशिक आणि राष्ट्रवादाचा मेळ खरच उत्तम प्रकारे घालण्याचा प्रयत्न केलाय. मात्र खरच एक गोष्ट प्रकर्षान जाणवते आणि ती म्हणजे लेखानातली निष्काळजी. मान्य करतो की या टायपींग मिस्टक्स आहेत. मात्र एवढ्या संवेदनशील विषयावर टायपींगची असंवेदनशीलता जाणवते. त्याचा वाचकाला त्रास होतो. त्यामुळं कृपया येवढं काळजीपुर्वक लक्षात घ्यावं.