
Monday, December 21, 2009
गडकरींनी दिल्लीत जाणे योग्य आहे का ?

Tuesday, December 8, 2009
अपेक्षा एका मोठ्ठ्या सुट्टीची


एखाद्या छानश्या समुद्रकिना-यावर...
कुठतेरी दूर डोंगरात धुक्यात एखाद्या नदीच्या काठावर...
कुणाशीही संवाद न साधता येईल, मोबाईलची रेंज पोहचत नसलेल्या एखाद्या
हिरव्यागर्द किल्ल्यावर..
दूर कुठेतरी चारचाकी गाडीत रस्त्यातल्या शेतातल्या धान्यांचा वास घेत
सुरु असलेल्या प्रवासावर...
दूर कुठेतरी पोटभर भाताच्या जेवणानंतर, पाड्यावर पडलेल्या खाटेवर..
दूर कुठेतरी लाल डब्ब्याच्या गाडीत एकटाच थंडीला शालीत लपेटून घेत
झोपेला आवर्जून बोलणा-या डोळ्यांवर...
दूर कुठेतरी चांदण्यांच्या आवारात, शेतात पडल्या पडल्या
सुरु असलेल्या आकाश निरीक्षणावर..
दूर कुठेतरी जिथे निसर्गाच्या ओकारांचा आवाज
कानात भारुन राहील अशा ठिकाणावर..
दूर कुठेतरी आत्ताच्या या जगण्याच्या सगळ्या आणि सगळ्याच
माणसांच्या चेह-यातून डोळ्यांतून, विचारांतून...
दूर कुठेतरी...दूर कुठेतरी...
गरज एका खूप खूप खूप मोठ्ठ्या सुट्टीची ...
Tuesday, October 20, 2009
संपली बाबा निवडणूक


असो या निवडणुकीत गंमत अशी फारशी दिसली नाही.. त्यातही पूर्वीच्या काळी असलेली पक्ष निष्ठा वगैरे किती कमर्शिअल झाली आहे ते सगळीकडेच पहायला मिळालं.. तिकीट मिळालं नाही तर दुसरा पक्ष किंवा तोही नाही मिळाला तर व्हा बंडखोर.. यांचं पीक किती अफाट होतं.. उदा. अण्णा जोशी, विनय नातूंसारख्या माणसांवर झालेला अन्याय.. अशी कितीतरी उदाहरणे आणि या सा-याचा राजकीय गणितावंर होणारा परिणाम पाहण्यासाठी आत्तातरी आपल्याला आणखी दोन दिसांची वाट पहावी लागणार आहे..
पहिल्यापासूनच माझ्या मते ही निवडणूक एकतर्फी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची होती.. त्यांच्या दहा वर्षांच्या पापाचं कोणतंही चीज विरोधी पक्षातील कोणीही करु शकलं नाही.. आणि लोडशेडिंग, शेतकरी, पाणी, रस्ते थोडक्यात विकास या मुद्द्यावर अपेक्षित असणारा प्रचार दुर्देवाने मराठीच्या मुद्द्याभोवती फिरत राहिला.. प्रसारमाध्यमांमध्येही फक्त राज ठाकरे हेच प्रामुख्याने दिसून आले..त्याची त्यांची गणित वेगळी असली तरी त्याचा परिणाम मात्र व्हायचा तोच झाला.. म्हणजे विकासाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्षच झालं..
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना यांच्यातील अनेक नेत्यांना यंदा गेल्या वेळेप्रमाणे ग्लॅमर मिळालचं नाही..खुद्द पवारांनाही हेही सगळ्यांनाच मान्य करावं लागले.. त्यातच आघाडीसाठी झालेला उशीर, मग तिकीट वाटपातील मारामारी आणि मग बंडखोरांची संकट यातच त्यांचा निम्मा जीव दडपून गेला..हे तर त्यांनाही खाजगीत मान्य होईल..
त्यातल्या त्यात एकमेक भाजपचे नितीन गडकरी यांनी काय तो हा मुद्दा पहिल्यापासून लावून धरला... हे विशेष..
या निवडणुकीत महत्वाचं म्हणजे निवडणुकीला एक ग्लॅमर विनाकारण प्राप्त झालय. अनेक सेलिब्रिटी नाहक या राजकारणात उतरले आणि त्याचा परिणाम ज्यांना खरोखरच प्रसिद्धी मिळायला हवी त्यांच्या फटक्यात झाली..
आणखी एक म्हणजे या निवडणुकीत झालेल्या मारामा-या परवाच मी मोजल्या तर तब्बल 10 ते 15 या रेंजमध्ये गोळीबार, मारहाणी यासारख्या घटना या निवडणुकीत घडल्या.. राज्याच्या सत्तेची निवडणूक किती महत्वाची आहे हे यामुळे सगळ्यांच्या लक्षात आलं..
रिडालोस हा तिस-या आघाडीचा प्रयोग यावेळी वेगळा म्हणावा असा ठरला.. मात्र त्यांचा प्रभाव किती जागांवर पडेल.. या बाबत मात्र काही अंशी शंका आहे..
आता निकाल काय लागतील हे महत्वाचं
माझ्या मते
काँग्रेस आघाडी- 120 ते 130 दरम्यान ( काँग्रेस65 ते 70, राष्ट्रवादी 55 ते 60)
शिवसेना भाजपा- 110 ते 120 ( शिवसेना 60 ते 65, भाजप 50 ते 55)
मनसे- 8 ते 10
रिडालोस- 5 ते 8
बंडखोर - 15 ते 20
पाहुयात काय होतय ते..
एक मात्र खरं की सरकार काँग्रेस आघाडीचेच येणार..
Monday, August 10, 2009
बदल...
अगदी काही महिन्यांपूर्वीचा मी आणि आत्ताचा मी यातही किती बदल झालाय, हे जाणवलं आणि झपाट्यानं बदल हा शब्द मला आव्हानात्मक वाटायला लागला...
आता विचार करताना जाणवतं की हा बदल फक्त माझ्यापुरता नाही, तर आसपासच्या नात्यांमध्ये, मैत्रीमध्ये, आपल्या जवळच्या असणा-या वक्तींमध्ये सगळ्यांमध्येच झालाय.. अगदी काही क्षणांपूर्वी जगलेले क्षण आपण तसेच पुन्हा नाही जगू शकतं..
उदाहरणच द्यायचं झालं तर एखादा सिनेमा किंवा एखादं पुस्तक वाचताना पहिव्यांदा आपणं ज्या तन्मयतेने आपण वाचतो..तेच दुस-यांदा वाचताना आपण त्या स्थितीला नसतो... कधीकधी ते वाटन किंवा पहाणं कंटाळवाणं होतं.. किंवा त्यातून अधिक काही तरी भरीव आपल्या हाती येतं..जे कदाचित गेल्यावेळी आपल्या पहाण्यातून किंवा वाचनातून निसटलेलं असतं... म्हणजेच आपण अधिक समृद्ध झालो असून तरच काहीतरी भरीव आपल्या येतं असचं काहीतरी...
... मग हा बदल खरचं समृद्ध करणारा असतो का.. की काही चांगल्या वाईट अनुभवामुळे आपण बदलत जातो... ते तर आहेच ते ओघाने होणारच मात्र कोणता अनुभव तुमच्या मनावर किती मोठा आघात करेल.. किंवा एखादी चांगली आठवण देऊन तुम्हाला समृद्ध करेल यावर हा बदल अवलंबून आहे.... माझ्यामते असे समृद्ध होणारे फार थोडके आपल्याकडे असतील...
प्रपंचात पडल्यावर येणा-या जबाबदा-या, व्यवहार, नोकरीतला तोच तोच पणा यातून माणसं कशी टिकतात याचंही मला कोडं आहे... बर सरावलेलं काम पुन्हा पुन्हा करण्यात काय आनंद आहे..त्यापेक्षा एखादं आव्हान तुम्हाला कायमचं माफ करा नेहमी नेहमी म्हणजे क संपल्यावर दुसरं अशा क्रमाने का मिळत नाही... खरतरं माझ्यामते या अश्या आव्हानातून आपण अधिकाधिक समृद्ध होतो..
माझ्यापुरता विचार केला तर मी गेल्या आठ-दहा वर्षात अफाट बदललो..काही चांगल्या अर्थी आणि ब-याचश्या वाईट अंशी... मग आता पुढे काय.. असा प्रश्न कधीतरी पडतो आणि अधिक अडचणीत साप़डतो... हा बदल मान्य... मागे एकदा मेघना पेठेंच पुस्तक वाचताना अंधळ्यांच्या गाई वाचताना त्यातलं हेच मला विशेष जाणवलं.. त्यांनी त्या पुस्तकांच्या कुठल्यातरी एका कथेत नमेकं हेच सांगण्याचा प्रयत्न केला होता.. मग हा बदल आपण कश्याप्रकाराने घ्यावा..
उदाहरण देतो मी जिथे लहानपण घालवलं.. त्या गावात मी सुमारे 12-14 वर्षाने पुन्हा गेलो.. माझ्या मनात माझं आधीचचं गाव होतं.. आणि ते अगदी जस्सच्या तसं असावं असं मला वाटत होतं.. माझी शाळा, गावाची रचना, मात्र या सगळ्यांचा गेल्या काही वर्षांत इतका विस्तार झाला की आता ते माझं गाव आहे, हेच मला पटेनासं झालं... आणि मनातनं खूप वाईट वाटलं.. त्या काळी खूप मोठ्ठ वाटणार गावं आता मला अगदीच लहानही वाटू लागलं... आणि त्याचंही खूप वाईट वाटलं.. आता यावर उपाय काय तर पुन्हा फिरुन तिथे जायचं नाही असा निर्णय मी घेतला... म्हृणजे माझ्या मनातलं गाव मात्र तसाच राहिल यासाठी..
माणसं बदलणं हे लक्ष चागलंच त्यात त्यांचा विकास आहे, समृद्धी आहे मात्र त्याचबरोबर काही जुने बंध मात्र तुटत जाणं, हे किती चांगंल हा प्र्न मला नेहमी पडतो.. माझा एक चुलतभाऊ अमेरिकेत असतो..त्याची आणि माझी खास मैत्री होती, म्हणजे जाण्यापूर्वी.. अगदी सख्ख्या भावासारखी.. आम्ही ब-याच ब-या वाईट गोष्टी एकमेकांकडे शेअर करत असू ... आता मात्र गेल्या सात आठ वर्षांत त्याचे काही फोन सोडले तर त्याचा माझा संपर्क नाही.. आणि त्याच्या आणि माझ्या
या बदलांत आता मात्र आम्ही एकदम भिन्न काठांवर तर पोहचलो नाहीयेत ना..
मग मला वाटतं अशी माणसं बदलणं कितपत योग्य की ज्यामुळे तुमच्यातले धागेच तुटले जातील.. गेल्या सात-आठ वर्षांत मी अशी कितीतरी अगदी जिवाभावाची माणसं गमावली.. म्हणजे सगळे आहेत आजूबाजूलाच पण आता तो धागा राहिला नाही.. असं का व्हावं.. कदाचित बदल हेच त्याचं मुख्य कारण असावं..
तर हा सातत्यानं होणारा बदल आणि विसर्जन या दोन गोष्टी मी गेल्या काही वर्षांत अगदी आवर्जून अनुभवल्यात हे खरं.. आता यातल्या विसर्जनाबबात पुन्हा कधीतरी..
Thursday, June 18, 2009
मिसळ..

वयाच्या नवव्या दहाव्या वर्षापासून मी या मिसळीच्या प्रेमात आहे... आमच्या गावी म्हणजे माझं लहानपण जिथे गेलं तिथे हॉटेलांमध्ये फक्त सकाळच्या वेळातच मिसळ मिळते.. म्हणजे ज्या हॉटेलात चांगली मिसळ मिळते त्या हॉटेलात सकाळी आठ वाजता नंतर मिसळ मिळत नाही.. म्हणजे कल्पना करा मिसळचे खवय्ये किती पहाटे उठून या मिसळीसाठी येत असतील.. गंमत जाऊ द्या पण पश्चिम महाराष्ट्रात आजही अनेक गावांमध्ये फक्त सकाळीच मिसळ मिळते.. सकाळी आजूबाजूच्या परिसारातून दूध घेन, भाज्या घेन गावात येणारे या मिसळीवर पहाटेच यथेच्च ताव मारतात..
आमच्या लहानपणी बाहेर हॉटेलात खाणं हे पाप समजलं जाई.. आणि पुणे-बई असा प्रवास झालाच तर हॉटेलात काही खाता येत असे.. अश्या काळात गावात जाऊन मिसळ खाणे असा योग मला आला.. आणि त्या दिसापासून आजपर्यंत इतक्या मिसळींचे फ्लेवर जिभेवर ठेऊनही हा पदार्थ मला अतिशय प्रिय आहे..
ज्या कोणी या मिसळ या पादार्थाचा शोध लावला असेल.. त्याला त्या लाल तर्रीचा सलाम..
आजही राज्यात कोणत्याही गावात गेलं तरी त्या गावची मिसळ खाण्याची प्रथा मी सुरु ठेवली आहे.. म्हणजे पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे, कोल्हापूर या सगळ्या गावांतील मिसळीचा त्यांचा त्यांचा एक स्वाद आहे.. पुण्यातल्या दोन तीन हॉटेलातली मिसळीची चव तर विसरुच न शकण्या पलिकडची आहे(म्हणजे आता नावं आठवत नाहीत.. त्यातलं एक तुळशीबागेत आहे.. भूलचूक माफ) मी राहतो बदलापुरात त्यामुळे आसपासची ठाण्यातील मामलेदारची, डोंबिवलीतील मुनमुनची, बदलापुरातील काटदरेंची मिसळ म्हणजे साक्षात परमेश्वराने भूतलावर पाठवलेलं अमृत आहे.. असं मी मानतो.. वांगणीतली मिसळ, नेरळच्या रेल्वे कँटीनची मिसळ, कर्जत स्टेशनाबाहेरच असलेल्या कौलारु हॉटेलातील मिसळ या सगळ्यांची चव म्हणजे वाहवाच..
जे खरोखरच खवय्ये आहेत..त्यांना एवढं सांगणही पुरे..
Wednesday, May 20, 2009
आता पाऊस येणार...
Tuesday, May 19, 2009
मतदारांचा इंगा
त्यातही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे राज्यातल्या राजकारणातील महत्व संपत चालल्याची चुणूक या निवडणुकीने दाखवली.. राज ठाकरे यांना मिळालेलं मताधिक्य हे त्यांचं यश आहे, असं मला वाटत नाही.. राज्यात कोणत्याच पक्षाकडे असं एकमुखी प्रभावी नेतृत्व नसल्याने त्याचा फायदा राज ठाकरेंना झालाय. असं या निवडणुकीबाबत वाटतं.. जरा सविस्तर पाहुयात
सर्वात मोठा फटका पडला तो आहे शरद पवारांना, मराठा स्ट्राँग मॅन अशी ओळख असणा-या पवारांना या निवडणुकीनं सर्वाधिक दुखावलं असणार.. त्यांच्या गडाचे बुरुजच या निवडणुकीत पूर्णत ढासळले.. पवारांना मिळालेल्या आठ जागांचे आपण विश्लेषण केले तर बारामती आणि माढ्याची जागा राष्ट्रवादीला मिळणे यात पवारांचा तसा फारसा वाटा नाही. बारामती त्यांना मिळणं अपेक्षितच होतं. माढ्याची निवडणूक ही पवार लढल्यामुळे जिंकणेही अपेक्षितच म्हणावे लागेल.. उरलेल्या सहा जागांपैकी उदयनराजेंची जागा ही पवारांचे यश अजिबातच नाही. उदयनराजे कोणत्याही पक्षाकडून उभे राहिले असते, प्रसंगी अपक्ष सुद्धा तरी त्यांनी ही जागा मिळवलीच असती. उरलेल्या पाच जागांपैकी संजय पाटील ही ईशान्य मुंबईची जागा आणि ठाण्यातील संजीव नाईक यांची जागा ही सुद्धा राष्ट्रवादीला लागलेली लॉटरीच म्हणावी लागले. मनसेला इतकी मते मिळाली नसती तर कदाचित ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आलीच नसती. समीर भुजबळ यांच्या विजयात छगन भुजबळांचाच वाटा महत्वाचा राहिला. आणि शेवटची प्रफुल्ल पटेल यांची जागाही निवडून येणं अपरिहार्य होतं. राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतले नेते असल्याने ते निवडून येणं हे क्रमप्राप्त होतं. मग हे विश्लेषण पाहिल्यानतंर जो पवारांचा करिष्मा राज्यात चालतो, अशी अख्यायिका गेल्या अनेक वर्षांपासून सगळेच जणं म्हणतात.. तो कुठेच दिसला नाही. पश्चिम महाराष्ट्रात शिरुर सोडून देऊ हवंतर पण मावळ, अहमदनगर, कोल्हापूर, हातकणंगले या जागा पवारांना दगाच कशा देऊ शकल्या हा मुख्य प्रश्न आहे. राष्ट्रीय नेते असणा-या आणि पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणा-या पवारांना चार जागा राखत्या आल्या नाहीत... असा प्रश्न पडतोच पडतो..म्हणजेच थोडक्यात पुढच्या काही लोकसभा निवडणुकांमध्ये पवार हे जर प्रचाराबाहेर असतील तर काय स्थिती असेल याची ही चुणूकच मानायला हवी ना.. सर्वात जास्त नेते मंडळी असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पवारांच्या मनातला ( त्यांच्या मनात यावेळी 13 पेक्षा जास्त जागा मिळतील) आकडा गाठू शकले नाहीत..कदाचित निवडणुकीच्या संपूर्ण काळात कोणतीही न घतेलेली ठाम भूमिका कदाचित पक्षाला मारक ठरली असावी.. सुरुवातीला घेतलेली शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा आणि नंतर काँग्रेस आघाडीत पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावरुन मतदारांचा झालेला संभ्रम हे याचं कारण असू शकतं..
दुसरा सर्वाधिक फटका बसला तो शिवसेनेला, शिवसेनाप्रमुख या निवडणुकीत प्रचारात नव्हतेच, त्यामुळे त्यांच्याकडे या पराभवाची जबाबदारी जात नसली, तरी बाळासाहेबांचा करिष्माही राज्यातून आणि विशेषत मुंबईतून कमी होत चाललाय, हे या निवडणुकीने दाखवून दिलं.. जो काही प्रचार उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यातही फारसा दम नसल्याने राज ठाकरेंच्या मनसेला त्याचा फायदा झाला..खरं तर राज यांचे सगळे उमेदवार अगदी नवखे असतानाही, त्या सगळ्यांना सरासरी एक-एक लाख मते मिळावीत.. हे शिवसेनेवरचा लोकांचा विश्वास उडत चालल्याचं चांगलं उदाहरण म्हणायला हवं..
दोन्ही पक्षांकडे संपूर्ण निवडणकीच्या प्रचारात तरुणांना आकर्षित करु शकतील असे विखारी प्रचार करणारे नेते मंडळी नसल्याने आणि कदाचित या निवडणुकीत कोणताही मुद्दा नसल्याने याचा फटका या दोन्ही पक्षांना बसलाय. आणि यातही विशेषत हे दोन्ही राज्यातले धुरंधर नेते हे उंबरठ्यावर येऊन पोहचले आहेत. हेच ही निवडणूक दाखवते आहे.
शेवटचा विषय राज ठाकरेंचा.. राज यांच्या मनसेने यश मिठळवलं असलं तरी ते पर्याय म्हणून आहे. त्यात राज यांचा स्वतचा काही कार्यक्रम नाही, ना त्यांना उभ्या-आडव्या महाराष्ट्राची जाणही नाही. मराठी माणसाच्या मुद्द्यावर राजकारण करणा-या मनसेनं आत्तापर्यंत किती जणांचे प्रश्न सोडविले, हेही तपासायलाच हवे.. मात्र अन्य कोणत्याही पक्षाच्या नेत्यांकडे असा विखारी प्रचार करणारा नेता नसल्याने राज यांना त्याचा फायदा झाला. विशेषत ते तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय होतायेत. हेही यानिमित्ताने समोर आलं. यापुढं राज्यातलं राजकारण हे राज यांच्याशिवाय होणार नाही, हेही यातून स्पष्ट झालय. मात्र तरीही हे राज यांचं वैयक्तिक यश आहे, त्यांच्या इमेजचं, पक्षाचं नाही.. आणि जर पुढच्या काही काळात ठोस कार्यक्रम दिला नाही ( म्हणजे आंदोलन वा तोडफोड नव्हे) तर विकासाचा कार्यक्रम तर काही वर्षात त्यांना याचीही फळं भोगावी लागतील.
निवडणुकीत काँग्रेसला झालेला सर्वाधिक फायदा, हा राज्यातील सरकारचा वा काँग्रेस नेत्यांचा नव्हे.. तर केंद्रातील सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं कार्य आणि त्यांची इमेज यांना मिळालेला हा प्रतिसाद आहे. तसचं हेच स्थिर सरकार देऊ शकतात, अडवाणी नव्हे. हे मतदारांनी लक्षात घेतलं. याशिवाय पारंपारिक पद्धतीने की काँग्रेसच देश तारु शकतं, यामुळे झालेलं मतदान आहे. त्यामुळे राज्यात सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळूनही राज्याच्या पातळीवर त्यांना कुणाला श्रेय देता येणार नाही, मात्र भविष्यात त्यांना याचा चांगला फायदा घेता येणार आहे.
महाराष्ट्रात माझ्या अंदाजाप्रमाणे भाजपा पहिल्या क्रमांकार, काँग्रेस दुस-या, शिवसेना तिस-या आणि शिवसेना चौथ्या क्रमांकावर राहिल असा अंदाज होता. मात्र भाजपकडे एवढे तगडे उमेदवार असूनही त्यांना त्याचा फायदा झालाच नाही.
अखेरीस लोकसभा निवडणूक 2009 चे निकाल जाहीर झाले आणि देशभरातील मतदार (म्हणजे ज्यांनी मतदान केलं ते..) किती सूज्ञ आहेत, हे त्यांनी दाखवून दिलं.. देशात काँग्रेस आघाडील्या मिळालेल्या यशाकडे नजर टाकली की लक्षात येईल की काँग्रेसला या निवडणुकीत सर्वात जास्त फायदा झाला आहे. गेल्यावेळी 145 जागांवर जिंकलेली काँग्रेस यावेळी 200चा आकडा पार करुन पुढे केली. स्थिर सरकार मिळणं सध्या सगळ्यांनाच गरजेचं असल्यानं जे झालं ते चांगलंच झालं याबाबत काहीच वाद नाही. काँग्रेसला बहुमत मिळालं नसतं तर प्रादेशिक पक्ष आणि अमरसिंगासारखे दलाल या निवडणुकीत खूप मोठे झाले असते. ते यानिमित्ताने होणार नाही.. आणि असाच ट्रेंड भविष्यात पडो अशी अपेक्षा करुयात.. भाजपचं झालेलं नुकसान, अडवाणींचं अपयश, डाव्यांची झालेली पिछेहाट, आणि राहुल गांधीचं यश अशी ही निवडणूक आहे. पुढच्या 10 वर्ष तरी पुन्हा एकदा काँग्रेसच देशावर राज्य करणार हे या निकालांमधून स्पष्ट झालयं. आणि हे भारताच्या दृष्टीने निश्चितच आशावादी आहे.
Thursday, May 7, 2009
निवडणूक न भावलेली..
गेल्या दोन निवडणुका हे वातावरण जरा फिक्क व्हायला लागलं असतानाच, यंदाच्या निवडणुकीत तर कोणातच फारसा उत्साह दिसलाच नाही.. ना पक्षांमध्ये, ना मुद्द्यांमुध्ये आणि ना मतदारांमध्ये
जरा सविस्तर बघुयात निवडणुका म्हटल्या की पक्ष कार्यकर्ते कसे जल्लोषात असायला हवेत.. पण या निवडणुकीत अगदी शेवटच्या पंधरा वीस दिवसांपर्यंत कुणाची युती कुणाशी हेच वातावरण स्पष्ट होत नसल्याने कोणातच फारसा उत्साह जाणवत नव्हता.. नाही म्हणायला जे प्रतिष्ठित नेते होते त्यांनी ही निवडणूक रंगवली पण त्यातही पाहिजे तसा मजा नव्हती..
विशेषत: महाराष्ट्रात तर यंदाच्या निवडणुकीत बाळासाहेबांची तोफ कडाडली नाही, पवार हे त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने प्रचार करीत राहिले.. उद्धव ठाकरे यांच्या भाषेत जोर नसल्यानं त्यांच्या भाषणांना विदर्भ मराठवाड्यात मिळाला तसा प्रतिसाद शहरांमध्ये मिळाला नाही, तर राज ठाकरे यांना प्रतिसाद मिळाला खरा, पण त्यांच्या उमेदवारांना का मते टाकायची हा प्रश्न सगळया सुज्ञ मतदारांच्या मनात कायम उभा राहिला.. विलासराव देशमुखांना मुख्यमंत्रीपदाचे ग्लॅमर संपलेले, तर अशोक चव्हाण नवखे असल्यानं प्रचार सभा रंगल्या नाहीत.. आरोप प्रत्यारोप, राजकारण, विकास असे मुद्देच कुठे जाणवले नाहीत.. नाही म्हणायला अंकुश राणे हत्या प्रकरणात राणे-शिवसेना हा पारंपारिक संघर्ष पुन्हा पहायला मिळाला, तर राज आणि चौगुले यांच्यात एक जुगलबंदी झाली.. पण या दोन बाबी सोडल्या तर फार काही वार-प्रतिवार झाले नाहीत.. याचंही कारण म्हणजे सगळेच एकाच जातकुळीतले असल्याने कुणी कुणाला का मारावं हाही प्रश्न होताच..
...... आणि हा प्रश्न फक्त राज्यातच नव्हता तर संपूर्ण देशात राहिला. वरुण गांधी, अडवाणी-मनमोहन सिंग वाद.. त्यातही पुन्हा कंदहार, बाबरी मशिद, मुंबई हल्ले यासारखे अतिशय पांचट मुद्दे चर्चेत राहिले... दुसरा मुद्दा राहिला तो शरद पवारांच्या पंतप्रधानपदाचा कमाल अवघ्या 15-20 खासदारांची कुमकही हाताशी नसताना, या मुद्द्यावरुन पवारांची प्रसिद्धी मात्र जोरदार झाली..
सुशीलकुमार शिंदे, छगन भुजबळ बडी मंडळीही फारसी कुठे दिसली नाहीत आणि आर आर ही उपमुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतर तसे दिसेनासेच झालेले.. खरतर केंद्रात राज्यातील इतकी मंडळी असतानाही ग्लॅमर असलेला एकही नेता संपूर्ण निवडणूक गाजवू शकला नाही.. नरेंद्र मोदींसारखा स्टार प्रचारकही राज्यात येऊन प्रचार करुन गेला, पण मजा आलीच नाही...
या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूकच मुळाच पुचाट अशीच झाली...
एक सामान्य मतदार म्हणून मी कोणत्या पक्षाला का मतदान करावं, हा प्रश्न या निवडणुकीत मला सातत्यानं पडत राहिला आणि त्याचं उत्तर केवळ नकारात्मकच मिळत गेलं...
कोणत्याही राजकीय पक्षावर विश्वास ठेवण्यासारखं नेतृत्वच दिसत नसल्याने मी यावेळी मतदान केलं नाही.. आणि अतिशय स्पष्टपणे हे मला सांगता यायलाच हवं.. कोणतंही ध्येय धोरणं नसणारी आणि कुणाही पाठीशी सहज जाउ शकणारी नेते मडळी असताना, त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी काही दिवस माझं बोट शाईने का माखून घेऊ असं मला सतत वाटलं.
त्यातच यंदाच्या निवडणुकांमध्ये मतदारसंघ पुनर्रचनेमुळे नवी काय गणित असतील, यामुळेही कदाचित यावेळी चिखलफेक कमी झाली असावी... विशेषत अनेक राजकीय पक्षांचे निकालानंतरच्या भवितव्याबाबत लक्ष असल्याने म्हणा निवडणूक रंगलीच नाही..
या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असं नाहीच, पण ज्या काही आघाड्या, युत्या होतील त्यातही येणारं सराकरं कितपत तग धरणार हाही प्रश्नच आहे... सध्याच्या परिस्थितीत तरी मायावती, जयललिता, पवार, लालू-पासवान, करात आणि इतर डाव्या प्रभुती आणि शेवटचे अमरसिंग हीच मंडळी पुढचं सरकार कोण हे ठरवणार हेच दिसतय.. त्यातून या सगळ्यांच्या महत्वाकांक्षा मोठ्या असल्याने सरकार कितपत स्थिर राहणार याबबात शंकाच आहे.. त्यामुळे येत्या एक-दोन वर्षात पुन्हा लोकसभा निवडणुकांना सामोरे जावे लागल्यास कुणालाच आश्चर्य वाटायला नको..
विशेष म्हणजे यावेळी मतदारांनी मतदान करावे यासाठी विशेष जागृती झाली.. ती अभिनंदीय पण त्याचा परिणाम मतपेट्यांमध्ये जाणवलाच नाही.. त्यातून मतदान सक्तीची मागणीही उभी राहिली..
एकूणच हा गेल्या दोन तीन महिन्यांचा काळ तसा निरसच गेला.. आता लक्ष आहे ते 16 मेच्या निकालाकडे .. मला वाटतं की खरं राजकारण हे त्यानंतर सुरु होईल.. म्हणजे थोडक्यात असं की मतदारांनी काहीही कौल दिला तरी मतदारांना डावलून येणारं सरकार हेच हे लोकशाहीतलं सरकार असणारं..
आणि आपणही ते निमूटपणे मान्य करणार.. आहे की नाही सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रातल्या मतदारांचा विजय..
Monday, April 13, 2009
काहीच लिहावसं वाटेना..
काहीतरी नवं सुचावं, वाचावं, पहावं, असं वाटेनासं झालय.. काय म्हणायचं याला.. सॅच्युरेशन की आळशीपणा की आणखी काही..
लायब्ररीत पुस्तकांच्या गर्दीत हरवलो, तरी काहीतरी सुंदर हाती गवसताना दिसत नाहीये.. सिनेमा, टीव्ही, नाटकं यांचंही थोड्याफार फरकानं तेच झालय आणि जेवणातही तेच..वैविध्य..छान असं काही सापडत नाहीये..
प्रवासही फारसे होत नाहीयेत.. बाहेर उन्हाने जीव घातो की काय, असं वाटू लागलय..
आणि शेवटचं ज्या कामासाठी आपण जगतो.. ते काम करतानाही त्यात तोच तोच एकसूरीपणा येऊ लागलाय..
काय म्हणायचं याला.. काही चांगलं आजूबाजूला उत्साहवर्धक का घडत नाहीये.. की खरोखरच जगण्यातलं सर्जन नाहीसं होत चाललय... म्हणजे ही सर्वाधिक भिती आहे की आपण बनचुके होत चालले आहोत..
माणसं, नाती यांच्याबाबतही असंचं काहीसं का व्हावं..
चांगली निर्मीती आणि आशयघनता नसल्याने चांगलं पहायला, वाचायला मिळत नाहीये का.. की आपण जे चांगलं आहे तिथपर्यंत पोहचत नाहीयोत. काहीच कळेनासं झालय..
ज्या चळवळीतून आपण मोठे झालो, माणसांसाठी काम कारवं असं सतत वाटत राहिलं ती माणसं आता आजूबाजूला का नकोशी वाटायला लागली आहेत..
काय नक्की काय बिघडलंय काय..
की आपलं जगण्यावरचं प्रेमचं हळूहळू कमी होत चाललय.. आला दिवस ढकलायचा, ऑफीसातनं बाहेर पडताना संपला एक दिवस आणि नंतर उद्याचा आणि नंतर परवाचा.. ही भावना का मनात येऊ लागलीय.
उत्तर देणारेही संपेलत आणि ज्यांच्याशी संवाद व्हावा अशी माणसंही राहिलेली नाहीत.. कदाचित यालाच मोठं होणं म्हणत असावेत..
नवं ध्येय सापडावं, काहीतरी नवं करावं असं सारखं वाटतय, पण पुन्हा तेच काही दिसत नाहीये..
भिती वाटतेय की, आपण म्हातारे होऊ लागले आहोत..